सर्व काश्मिरी पंडित : टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. काश्मिरी पंडित समाजातील 177 शिक्षकांची खोऱयातून अन्यत्र बदली करण्यात आली आहे. या सर्वांना काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात पोस्टिंग देण्यात आली आहे. शुक्रवारी गृह मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीनगरमधील मुख्य शिक्षणाधिकऱयांनी जारी केलेल्या पत्रात सर्व शिक्षकांच्या बदल्यांची माहिती देण्यात आली आहे.
प्रशासनाच्या बदल्यांच्या निर्णयाकडे काश्मिरी पंडितांचा रोष शमविण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. सध्या खोऱयात सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगमुळे काश्मिरी पंडितांमध्ये नाराजी आहे. 31 मे रोजी रजनी बाला यांच्या हत्येनंतर सांबा येथे शिक्षकांनी आंदोलन केले होते. जम्मूमध्ये बदली केल्यास सातत्याने होणाऱया टार्गेट किलिंगला आळा बसेल, अशी काश्मिरी पंडितांची मागणी होती.
घाटीत सुमारे 5,900 कर्मचारी
घाटीमध्ये पंतप्रधान पॅकेज आणि अनुसूचित जाती या श्रेणींमध्ये सुमारे 5,900 हिंदू कर्मचारी आहेत. त्यापैकी 1,100 लोक संक्रमण शिबिरात राहतात, तर 4,700 खासगी निवासस्थानात राहतात. निर्बंध असूनही, खासगी निवासस्थान आणि छावण्यांमध्ये राहणारे 80 टक्के कर्मचारी काश्मीर सोडून जम्मूमध्ये पोहोचले आहेत. अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगर येथील छावण्यांतील अनेक कुटुंबे पोलीस-प्रशासनाच्या देखरेखीमुळे बाहेर पडू शकत नाहीत.