नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाच्या संकटामुळे सध्या लांबणीवर टाकल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेचा उर्वरित टप्पा संयुक्त अरब अमिरातमध्ये दि. 18 किंवा 19 सप्टेंबरपासून खेळवला जाईल, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने वृत्तसंस्थेला दिली. साधारणपणे 3 आठवडय़ात उर्वरित 31 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील फायनल दि. 9 किंवा 10 ऑक्टोबर रोजी घेण्याचे बीसीसीआयचे नियोजन आहे.
‘बीसीसीआयने स्पर्धेतील सर्व संलग्न घटकांशी संपर्क साधला असून वीकएण्डला उर्वरित टप्प्याचा श्रीगणेशा व्हावा, या दृष्टीने तारखा निवडल्या आहेत. याचप्रमाणे ऑक्टोबरमध्येही वीकएण्ड नजरेसमोर ठेवून फायनलसाठी संभाव्य तारखा ठरवल्या आहेत. उर्वरित टप्प्यात 10 डबल हेडर्स असतील व 7 इव्हनिंग मॅचेस असतील. याशिवाय, 4 निर्णायक फेरीतील सामने (2 क्वॉलिफायर्स, 1 एलिमिनेटर व फायनल) होतील. याप्रमाणे 3 आठवडय़ात उर्वरित 31 सामने खेळवले जाणार आहेत’, असे या पदाधिकाऱयाने नमूद केले.
भारतीय संघाची इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी दि. 14 सप्टेंबर रोजी संपेल आणि त्यानंतर पूर्ण संघ (हनुमा विहारी व अभिमन्यू ईश्वरन वगळता) चार्टर्ड फ्लाईटने युएईकडे रवाना होईल. संघाचा हा प्रवास ‘बबल टू बबल ट्रान्स्फर’ स्वरुपाचा असणार आहे.
द. आफ्रिकेविरुद्ध टी-20 रद्द
बीसीसीआयने यादरम्यान सप्टेंबरमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध आयोजित टी-20 मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी या मालिकेचे आयोजन केले गेले होते. भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात 2 कसोटी सामने खेळणार असून त्याच्या तारखातही बदल होण्याची शक्यता आहे. आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा केव्हा पूर्ण होणार, यावर या मालिकेची रुपरेषा अवलंबून असणार आहे.