दुपारी 12 ते 4 या वेळेत देशव्यापी आंदोलन छेडणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शेतकरी आंदोलनाचा तिढा सुटत नसल्याने आता आंदोलनकर्त्या शेतकऱयांनी पुढील आठवडय़ात ‘देशव्यापी रेलरोको’ची हाक दिली आहे. 18 फेबुवारीला दुपारी 12 ते 4 या चार तासांच्या वेळेत संपूर्ण देशात रेलरोको करण्याचा इशारा संयुक्त किसान मोर्चा संघटनेने बुधवारी दिला. या आंदोलनाअंतर्गत शांततेच्या मार्गाने रेल्वेमार्ग अडवण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनादरम्यान कोठेही तणाव निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. यापूर्वी मागील आठवडय़ात तीन तासांसाठी देशव्यापी चक्काजाम करून रस्ते वाहतूक अडविण्यात आली होती.
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिने उलटत आले आहेत. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकानंतरही नवीन कृषी कायदे मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संसदेतील आपल्या भाषणातून शेतकऱयांना आंदोलन मागे घेऊन चर्चेसाठी येण्याचे आवतण दिले असले तरी शेतकरी संघटना अजूनही आपल्या कडक पवित्र्यापासून मागे हटलेल्या नाहीत. शेतकरी आंदोलकांनी सरकारला कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली असून तोपर्यंत वेगवेगळय़ा माध्यमातून आंदोलनाला व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.