5 जणांची प्रकृती गंभीर ः मृतांची संख्या वाढण्याची भीती
वृत्तसंस्था/ छपरा
पूर्ण दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये आता विषारी दारूने बळी घेतले आहेत. बिहारमध्ये आतापर्यंत 18 जणांचा विषारी दारू प्राशन केल्यामुळे मृत्यू झाला आहे. तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. विषारी दारूने अनेकांचा बळी गेल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. तर दुसरीकडे चहुबाजूने लक्ष्य ठरलेल्या नितीश कुमार यांनी विधिमंडळात भाजपवर संताप व्यक्त करत दारूबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
सारन तसेच छपरा जिल्हय़ात विषारी दारूने बळी घेतले आहेत. तर अनेकांची विषारी दारूच्या प्राशनामुळे प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या सर्व लोकांनी एकत्र मद्यप्राशन केले होते, त्यांची प्रकृती बिघडल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे योग्य उपचार झाले नसल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
विषारी दारूमुळे होणाऱया मृत्यूंचे प्रमाण वाढत चालल्याने प्रशासनाने संबंधित भागांमध्ये आरोग्य विभागाचे पथक पाठविले आहे. तसेच आशा कार्यकर्त्यांना प्रकृती बिघडलेल्या लोकांची ओळख पटविण्यास सांगण्यात आले आहे. इशुआपूर मसरख, अमनौरमध्ये 10 जणांचा विषारी दारूच्या प्राशनानंतर संशयास्पद मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे प्रशासनाने प्रभावित भागांमध्ये छापेमारी सुरू केली आहे. अबकारी विभागाने मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई चालविली आहे. मद्यनिर्मितीची माहिती दिल्यावरही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विषारी दारूने अनेक जणांचा बळी घेतल्यावर राज्यात विविध ठिकाणी नितीश कुमार सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. तर दुसरीकडे दारूबंदीच्या निर्णयामुळे स्थानिक स्तरावर अवैध मद्यनिर्मिती सुरू झाल्याचा आरोप केला जात आहे.