मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : आझाद मैदानावर अखंड विजय ज्योतचे स्वागत
प्रतिनिधी /पणजी
भारत पाकिस्तानच्या 1971 च्या युद्धाचा परिणाम म्हणून पाकिस्तानचे विभाजन होऊन बांगलादेशचा जन्म झाला. भारत काय करु शकतो याची परत आठवण करुन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे करण्याचे जाहीर केले. हा उपक्रम अत्यंत स्तुतीजन्य असून त्यात गोव्याला सहभागी होण्याची संधी मिळाली हे प्रत्येक गोमंतकीयांचे भाग्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
भारत पाक युद्धात भारताने मिळविलेल्या विजयाला 50 वर्षे होत असल्याने भारतभर उत्सव साजरा केला जात असून दि. 3 डिसेंबर 2020 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार अखंड ज्योती पेटवून भारताच्या चारही दिशांना पाठवल्या. त्यातील एक ज्योत दिल्ली, मथुरा, कोटा, अजमेर, जोधपूर, जामनगर, द्वारका, पोरबंदर तसेच गुजरातमधील अनेक शहरांचा दौरा करुन मुंबई येथे आली. तेथून ती आता गोव्यात आली असून राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी येथील आझाद मैदानावर झालेल्या कार्यक्रमात या विजय ज्योत मशालीचे स्वागत केले.
या ठिकाणाहून सदर मशाल कारवारमार्गे बेळगांव येथे जाणार आहे. तेथून पुणे करत झाशी, ग्वालेरहून 3 डिसेंबर 2021 रोजी दिल्लीला होणाऱया स्वर्णिम विजय वर्ष सोहळ्य़ाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.
या मशालीच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, 1971चे युद्ध झाले तेव्हा आपला जन्मही झाला नव्हता पण त्या युद्धाच्या विजयाच्या स्मृतीने देश प्रेमाने छाती अभिमानाने फुलून आली. या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय प्रेम तर जागे झालेच आहे शिवाय पाकिस्तानलाही ते एक शब्दही न काढता उत्तर असल्याचे ते म्हणाले.
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनही विसरता नये : राज्यपाल श्रीधरन पिल्लई
भारत पाक 1971 च्या युद्धात सर्वप्रथम हल्ला पाकिस्तानाने अमृतसर आणि आगरा येथे केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने केलेल्या कारवाईत 13 दिवसात पाकिस्तान शरण आला. सुमारे 8 हजार पाकिस्तानी सैनिक मारले गेले व 93 हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले. त्यात बांगलादेशचा जन्म झाला. पण बांगलादेशात त्यापूर्वी चाललेल्या विद्यार्थी आंदोलन आणि राजकीय उलथापालथला विसरता कामा नये, असे मत राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी मांडले.
पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तानपासून मुक्ती हवी असा मुद्दा उपस्थित करुन शेख मुजीबूर रहमान यांनी चळवळ सुरु केली. त्याचा परिणाम म्हणून 1970 साली झालेल्या निवडणुकीत रहमान गट बहुमताने विजयी झाला पण त्यांच्याकडे सत्ता न देता त्यांना अटक करण्यात आली. लोक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांच्यावर पाकिस्तानने सैन्य कारवाई केली. त्यामुळे करोडो शरणार्थी भारतात आले. भारताने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला पण त्यावेळी भारताला पाठिंबा मिळाला नाही. परिस्थिती विस्फोटक स्थितीत पोहोचली तेव्हा भारताने आपल्या सैन्याला तयार राहायला सांगितले. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने पहिला हल्ला केला व 16 डिसेंबर रोजी युद्ध संपले असे राज्यपालांनी आपल्या भाषणात माहिती देताना सांगितले.
या मशालीचे स्वागत म्हणून पणजीत 7 कि.मी. मॅरेथॉन दौड, मडगावात सायकल रॅली आयोजित करण्यात आली व फोंडा शहरातही स्वागत समारंभ आयोजित करण्यात आल्याचे ब्रिगेडियर ए. एस. सहानी यांनी सांगितले.
युद्ध वीरांचा सत्कार
या 1971 च्या भारत पाक युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांचा यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या दिवंगत लेफ्टनंट कर्नल झेवियर डिकॉस्ता यांचा सन्मान त्यांच्या पत्नी सेंड्रा डिकॉस्ता यांनी स्वीकारला. इतर सैनिकामध्ये गोव्यात राहात असलेले माजी नौसेना प्रमुख एडमिरल अरुण प्रकाश, लेफ्टनंट जनरल आर. के. कडवाल, कर्नल अर्जुन देवा, लेफ्टनंट किशनलाल श्रीवास, सुभेदार रामचंद्र गावस, लिडिंग मेकनिक जगन्नाथ शिरोडकर व दामोदर कामत यांचा सत्कार करण्यात आला.