ऑनलाईन टीम / गुना :
लॉक डाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या अनेक मजुरांनी घरी जाण्यासाठी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. घरच्या वाटेवर निघालेल्या या मजुरांवर पुन्हा एकदा काळाने घाला घातला आहे.
महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेल्या स्थलांतरित मजुरांच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात आठ जणांनी आपला जीव गमावला आहे. तर 50 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मध्यप्रदेशातील गुना येथे हा अपघात झाला आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर दुसरीकडे बिहारला जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांचा मुझफ्फरमध्ये रोडवेज बसने चिरडल्याने 6 मजूर जागीच ठार झाले. हे मजूर मुझफ्फरनगर-सहारनपुर मार्गावरून आपल्या घरी पायी निघाले असता, घलौली चेकपोस्ट जवळ एका भरधाव बसने या मजुरांना चिरडले. या प्रकरणी अज्ञात बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत झालेले सहा मजूर हे बिहार मधील गोपाळगंज जिल्ह्यातील असून ते पंजाब मधून पायी परतत होते.