आजपासून मास्क, सामाजिक अंतर सक्तीचे : नियमांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई मुख्यमंत्र्यांचा इशारा
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाची दुसरी लाट तीव्र होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने नियम कठोर केले आहेत. मंगळवार दि. 30 मार्चपासून मास्कचा वापर आणि सामाजिक अंतर राखण्याची सक्ती करण्यात आली आहे. जर नियमांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय पुढील दोन आठवडे राज्यात कोठेही आंदोलन, निदर्शने, यात्रा-उत्सव साजरे करण्यास परवानगी नसेल. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन जारी करणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले आहे.
कोरोना नियंत्रणासंबंधी सोमवारी सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक पार पडल्यानंतर येडियुराप्पा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. मंगळवारपासून मास्क आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. पुढील 15 दिवसांपर्यंत मोर्चे, निदर्शनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी देखील वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करून कोरोना नियंत्रणासाठी पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे, असेही येडियुराप्पा म्हणाले.
अपार्टमेंटमध्ये पाटर्य़ांच्या आयोजनावर निर्बंध घातले असून तेथील जीम आणि स्विमींग पुल बंद ठेवले जाणार आहेत. गुलबर्गा, म्हैसूर, मंगळूर, उडुपी या जिल्हय़ांमध्ये दिवसाला 100 हून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासंबंधी जिल्हा प्रशासनांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
शाळा बंदबाबत परीक्षेनंतर निर्णय
कल्याण मंटपांमध्ये विवाह व इतर कार्यक्रमांमध्ये कोविड मार्गसूचींचे उल्लंघन झाल्यास मालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. शाळा-महाविद्यालये बंद केली जाणार नाहीत. परीक्षा संपल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. राज्यातील पोटनिवडणुकीवेळीही मार्गसूचींचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे, असे येडियुराप्पा म्हणाले.
बेंगळूरसह कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असणाऱया जिल्हय़ांमध्ये कोविड सेंटर उघडण्यात आली असून 5 एप्रिलपासून सुरू होतील. कोविड चाचण्या वाढविण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. कोरोनाबाधितांच्या प्राथमिक संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी महसूल, शिक्षण खात्यातील कर्मचाऱयांचा वापर केला जात आहे. बेंगळूर शहर आणि बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात सरकारी इस्पितळांमध्ये 1,630 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी इस्पितळांना देखील कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सज्ज राहण्याची सूचना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
परीक्षा होणारच !
कोरोना संसर्ग वाढत असल्याने यंदा देखील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आहे. रविवारी आरोग्यमंत्र्यांनी याबाबतचे वक्तव्य केले होते. मात्र, सोमवारच्या उच्चस्तरिय बैठकीत शाळा-महाविद्यालये बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती देताना मुले घरात राहण्यापेक्षा शाळेत असणे उत्तम. परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा विचार सरकारचा नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.