हणजूणातील नागरिकांचा इशारा
प्रतिनिधी/म्हापसा
हणजूण गावात अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने गावात पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. याबाबत पाणी पुरवठा खात्याकडे तक्रार करूनही ते याकडे लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी हणजूणच्या गावातील नागरिकांनी एकत्र येऊन याबाबत बैठक घेऊन सरकारचा निषेध करीत आपला मोर्चा पाणी पुरवठा खात्यावर नेऊन याबाबत म्हापसा पाणी पुरवठा खात्याच्या अधिकारी वर्गांना जाब विचारला. दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास शिवोली मतदारसंघातील सर्व नागरिकांना घेऊन भव्य मोर्चा आणण्याचा इशारा दिला.
गेल्या वर्षभरापासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ हणजूणमधील काही रहिवाशांनी आक्रमकता दाखवित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या म्हापसा येथील कार्यालयातील साहाय्यक अभियंत्यावर घेराव घालून प्रश्नांचा भडीमार केला. अधिकाऱयांना यावेळी निवेदन सादर करून सरकारचा निषेधही केला. साहाय्यक अभियंता तनय कांदोळकर व दीपक बोरकर यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी दोन दिवसांची मुदत देण्यात आली अन्यथाक्त्या गुरुवारी भव्य मोर्चा आणू असा इशाराही त्यांनी दिला.
हणजूण भागात मोठी हॉटेल्स येत असल्याने प्रथम प्राधान्य त्यांना देण्यात येते, काही भागातील पाणी चोरून हॉटेल्सना वळविण्यात येते त्यामुळे ग्रामस्थांना पाणी पुरवठा योग्यरित्या होत नाही. गेल्या वर्षभरापासून ही समस्या उद्भवत असून म्हापसा पाणी पुरवठा खात्याला अनेकदा तक्रार करूनही त्याबाबत खात्याचे अधिकारी वर्ग लक्ष देत नव्हते. आठवडय़ातून चार दिवसही पाणी येत नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांचे बरेच हाल झालेले आहे. हे लक्षात घेऊन ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत म्हापसा पाणी पुरवठा खात्यावर मोर्चा आणण्याचा निर्णय घेतला.