सर्वोच्च न्यायालयाचा 9 वर्षे जुन्या प्रकरणी आदेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2011 मध्ये झालेल्या केरळच्या किनाऱयावर 2 भारतीय मच्छिमारांच्या हत्येचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी बंद केले आहे. या प्रकरणात इटलीचे 2 नौसैनिक सल्वाटोर गिरोन आणि मासिमिलियानो लातोरे हे आरोपी होते. हत्येनंतर या दोन्ही नौसैनिकांना अटक करण्यात आली होती.
न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. केंद्र सरकारने मागील आठवडय़ात दोन्ही भारतीय मच्छिमारांच्या हत्येप्रकरणी इटलीकडून भरपाईदाखल 10 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याचे न्यायालयाला कळविले होते.
केरळच्या 2 मच्छिमारांना गुन्हेगार समजून ठार करणाऱया इटलीच्या दोन नौसैनिकांवर भारतात सुरू असलेला खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला आहे. 2021 च्या या घटनेसाठी इटलीने आंतरराष्ट्रीय लवादाच्या आदेशानुसार 10 कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. पीडित कुटुंबांनी भरपाईची रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शविली आहे. या नौसैनिकांवर आता इटलीत खटला चालविला जाणार आहे.
हे नौसैनिक एकदा मायदेशी जाऊन परतले होते. पण दुसऱयांदा इटलीत गेल्यावर तेथील सरकारने त्यांना परत पाठविण्यास नकार दिला होता. कारवाईमुळे नाराज इटलीने एकदा स्वतःच्या राजदूताला भारतातून परत बोलाविले होते.
15 फेब्रुवारी 2012 रोजी केरळमधील मच्छिमार अजीश पिंकू आणि जेलेस्टाइन अंबलापुझा किनाऱयानजीक समुद्रात मासेमारी करत होते. तेथे त्यांची नौका सिंगापूरहून इजिप्त येथे जात असलेली इटलीची ऑईल शिप एनारिका लेक्सीनजीक आली होती. शिपमध्ये चालक दलाचे 34 सदस्य होते आणि यातील 19 भारतीय होते. शिपवर इटलीचे दोन नौसैनिक होते, त्यांनीच गोळीबार करून मच्छिमारांची हत्या केली होती.
हत्येच्या घटनेची माहिती कळताच भारतीय तटरक्षक दलाने शिपला ताब्यात घेत 17 फेब्रुवारी रोजी कोची येथे आणले होते. 19 फेब्रुवारी रोजी केरळ पोलिसांनी इटलीच्या दोन्ही नौसैनिकांना अटक केली होती. इटलीच्या सरकारने आंतरराष्ट्रीय कायद्यांचा दाखला देत केरळ उच्च न्यायालयाला खटला संपुष्टात आणण्याचे आवाहन केले होते.