सीबीडीटीने ट्विट करत दिली माहिती
नवी दिल्ली
देशातील सुमारे 2.09 कोटी करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून 1.83 लाख कोटी रुपयांहून अधिकचा रिफंड (परतावा) जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) बुधवारी दिली आहे. 1 एप्रिल 2021 पासून 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत हा रिफंड जारी करण्यात आल्याचे सीबीडीटीकडून ट्विट करत सांगण्यात आले आहे.
याच्या अंतर्गत 2,07,27,503 प्रकरणांमध्ये 65,938 कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा जारी करण्यात आला. तर 2,30,556 प्रकरणांमध्ये 1,17,641 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट टॅक्स रिफंड जारी करण्यात आला.
2020-21 या आर्थिक वर्षासाठी नव्या ई-फायलिंग पोर्टलवर 31 डिसेंबर 2021 च्या कालमर्यादेपर्यंत सुमारे 5.89 कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) दाखल करण्यात आली होती. यापैकी 46.11 लाखाहून अधिक आयटीआर 31 डिसेंबर रोजीच दाखल करण्यात आले होते.