बंद काळात 28,810 कोटी रुपयांची शुल्क प्राप्ती : आयातीसह निर्यातीचेही आकडे सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि त्यासोबतच्या लॉकडाऊनमुळे विविध देशांच्या सीमा अन्य देशातील लोकांच्या प्रवासासाठी व व्यापारासाठी रोखून ठेवल्या आहेत. परंतु याच काळात काही प्रमाणात आयात करण्यात आली आहे. यामधूनच सीमा शुल्क विभागाने या कालावधीत 2.14 लाख कोटी रुपयांच्या आयातीला मंजुरी दिली असून यातून जवळपास 28,810 कोटी रुपयांचा शुल्क प्राप्त करण्यात आल्याचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभागाने (सीबीआयसी) सांगितले आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत 23 मार्च ते 10 मे या कालावधीत निर्यात आणि आयात करण्यात आलेल्या व्यापारावर आयात विभागाकडून 2.90 लाखापेक्षा अधिकची बिल ऑफ एंट्री वसूल केली आहे तर दुसऱया बाजूला निर्यातदारांनी 2.85 लाख शिपिंग बिल सादर केले आहे.
सदर कालावधीत करण्यात आलेल्या एकूण उलाढालीमध्ये जवळपास 2,14,710 कोटी रुपयांची आयात करण्यात आली असून 28,810 कोटी रुपयांचे शुल्क प्राप्त केले आहे. कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार 2.47 लाखहून अधिक निर्यातीचे आदेश असून 7,055 कोटी रुपयांचा निर्यात लाभ वितरित करण्यात आलाय. असल्याचे सीबीआयसीने एका ट्वीटमधून स्पष्ट केले आहे.
व्यापाराला चालना देणार
कोरोनाच्या संसर्गामुळे बचाव करण्यासाठी व सुरक्षा राखत व्यापाराला चालना देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीसोबत व्यापार करण्यावर येत्या काळात भर दिला जाणार असल्याचे सीबीआयसीने म्हटले आहे.