जुलैमध्ये ओडिशातूनही बीएसएफच्या दोन बटालियन रवाना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूरमध्ये तैनात आसाम रायफल्सच्या दोन बटालियन जम्मू-काश्मीरमध्ये तैनात केल्या जाणार आहेत. या बटालियनमध्ये 1,500 जवान असून त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे तेथे पाठवले जात आहे. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या या जवानांच्या जागी सीआरपीएफ तैनात करण्यात येणार आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरची सुरक्षा वाढवण्यासाठी बीएसएफच्या दोन हजार जवानांसह दोन बटालियन ओडिशातून जम्मू-काश्मीरला परत बोलावण्यात आल्या होत्या. हे सैनिक ओडिशात नक्षलविरोधी अभियानात तैनात होते.
जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी घटनांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या महिन्यात सुरक्षा बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा आणि एनएसए अजित डोवालही उपस्थित होते. त्याचवेळी मणिपूरमधून आसाम रायफल्सच्या जवानांना मागे घेण्यावर एकमत झाले होते.
जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ओडिशातून बीएसएफच्या 2 बटालियन जम्मूला पाठवल्या आहेत. त्यांच्यामध्ये 2 हजारांहून अधिक सैनिक आहेत. सांबा आणि जम्मू-पंजाब सीमेवर बीएसएफच्या बटालियन तैनात केल्या जाऊ शकतात. दिल्ली आणि जम्मूमध्ये सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जम्मूमध्ये बीएसएफची तैनाती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी या सैनिकांना छत्तीसगडला पाठवले जाणार होते.
आसाम रायफल्सकडे भारत-म्यानमार सीमेचे रक्षण
आसाम रायफल्सचे प्रशासकीय नियंत्रण गृह मंत्रालयाकडे असले तरी ऑपरेशनल नियंत्रण लष्कराकडे असते. आसाम रायफल्सचे जवान 1,600 किमी लांबीच्या भारत-म्यानमार सीमेचे रक्षण करतात. यापैकी सुमारे 400 किमी क्षेत्र मणिपूरमध्ये आहे. बीएसएफच्या काही बटालियन मणिपूरमध्ये तैनात आहेत, परंतु त्या विशेषत: भारत-म्यानमार सीमेवर तैनात नाहीत.