प्रतिनिधी/ फोंडा
चुकास बांदोडा येथे काजू बागायतीला आग लागून साधारण दोनशे काजूची झाडे होरपळून गेली. येथील काशीमठ जवळ आनंदी धनंजय नाईक यांच्या मालकीच्या या बागायतीला शुक्रवारी दुपारी आग लागली. त्यात साधारण दोन लाख रुपयांची हानी झाली आहे.
शुक्रवारी दुपारी लागलेली ही आग फोंडा अग्निशामक दलाच्या पथकाने आटोक्यात आणली होती. सायंकाळी पुन्हा बागयतीने पेट घेतला व तेथील गोठ्याची शेड व इतर साहित्य जळून खाक झाले. बागायतीमधील काजूची झाडे मोहरून त्यांना कच्ची फळेही आली होती. बहुतेक झाडे जळून खाक झाल्याने दोन लाखांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फोंडा अग्निशामक दलाच्या पथकाने तीन वेळा धावपळ करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र बहुतेक बागायती आगीत जळून खाक झाली आहे.