वृत्तसंस्था/ कैरो (इजिप्त)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्व नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत रविवारी भारताने आणखी दोन पदकांची कमाई केली. भारतीय महिला नेमबाजांनी 25 मीटर पिस्तुल सांघिक प्रकारात रौप्यपदक तर पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळविले.
या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 12 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य अशी एकूण 34 पदकांची कमाई केली. 2024 साली होणाऱया पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोटा पद्धतीमध्ये भारताने दोन जागा निश्चित केल्या. रविवारी झालेल्या महिलांच्या सांघिक 25 मीटर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या रिदम सांगवान, मनु भाकर आणि अभिज्ञा पाटील यांनी 443 गुण घेत रौप्यपदक मिळविले. या क्रीडा प्रकारात चीनच्या नेमबाजांनी सुवर्णपदक मिळविताना 444 गुण मिळविले. भारताचे या क्रीडा प्रकारातील सुवर्णपदक थोडक्मयात हुकले.
पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात भारताच्या ऐश्वर्य तोमर, स्वप्नील कुसाळे आणि निरजकुमार यांनी कांस्यपदक पटकाविले. नॉर्वेच्या नेमबाजांनी या क्रीडा प्रकारात सुवर्ण तर फ्रान्सने रौप्यपदक घेतले. पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल नेमबाजीत भारताच्या विजयवीर सिद्धूने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता विजयकुमार याला 13 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.