वृत्तसंस्था/ सिवनी
मध्यप्रदेशच्या सिवनीमध्ये मंगळवारी झुंडबळींचे प्रकरण समोर आले आहे. गोमांस तस्करीच्या संशयावरून तीन आदिवासींना जबर मारहाण करण्यात आली. यातील दोन जणांचा मृत्यू झाला तर एक युवक जखमी आहे. या घटनेची माहिती कळताच संतप्त ग्रामस्थांनी जबलपूर-नागपूर महामार्गावरील वाहतूक रोखून धरली आहे.
हत्या आणि वाहतूक रोखण्याच्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुरई गावातील सागर आणि सिमरिया गावातील धानशाह तसेच संपत बट्टी यांना काही युवकांनी मारहाण केली होती. हत्या करणारे कार्यकर्ते एका संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच बरघाटचे काँग्रेस आमदार अर्जुन सिंह काकोडिया देखील कुरई येथे पोहोचले. त्यांनी संतप्त लोकांसोबत महामार्गावर निदर्शने केली. संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यीं केली आहे.
12 किलो गोमांस हस्तगत
घटनास्थळावरून सुमारे 12 किलो गोमांस हस्तगत करण्यात आले आहे. हे गोमांस तपासण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून आरोपींना लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलीस अधिकारी गणपत सिंह उइके यांनी सांगितले आहे.
काँग्रेसकडून समिती
मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी सिवनी जिल्हय़ातील कुरई दोन आदिवासी युवकांच्या हत्येला दुःखद ठरविले आहे. घटनेचे गांभीर्य पाहता त्यांनी तीन आमदारांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती घटनास्थळी जात पीडित कुटुंबांना भेटून घटनेची पूर्ण माहिती मिळवून स्वतःचा अहवाल प्रदेश काँग्रेस समितीला सादर करणार आहे. समितीत आमदार ओंकार सिंह मरकाम, अशोक मर्सकोले आणि नारायण पट्टा यांचा समावेश आहे.