बेळगाव – काल सायंकाळी हेस्कॉमच्या लाईनवर काम करत असताना अचानक वीज प्रवाह संचरित झाल्याने अथणीत २ कामगारांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. रोजाने हेस्कॉममध्ये काम करणारे रायबाग तालुक्यातील हिडकल गावातील हनुमंत हालप्पा मगदूम (वय ३०) आणि अशोक माळी (३५) यांचा मृत्यू झाला. विजेचा धक्का लागल्याबरोबर स्थानिकांनी तातडीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. वीजेचे काम करण्यापूर्वी हेस्कॉमला माहिती देऊनही वीज पुरवठा प्रवाहित केल्याने विजेचा धक्का लागून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कामगारांचा नाहक बळी गेला आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केलेल्या हेस्कॉम अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि मृत कामगारांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

