लॉकडाऊन शिथिल करण्याची घोषणेतून मुख्यमंत्र्यांची माघार
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी 20 एप्रिलपासून लॉकडाऊन अंशतः शिथिल करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केली होती. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना हा निर्णय घेण्यात आल्याने सर्व स्तरातून विरोध झाल्यामुळे 3 मेपर्यंत पूर्वीप्रमाणेच लॉकडाऊन जारी राहणार असल्याचे त्यांनी शनिवारी रात्री पत्रकाद्वारे सांगितले आहे. कोणत्याही पासशिवाय दुचाकीवरून फिरण्यासाठी देण्यात आलेली सूट मागे घेण्यात आली आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मात्र नेहमीप्रमाणे राहणार आहे. आयटी कंपन्या सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे शनिवारी सकाळी कोरोना नियंत्रणासंबंधी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक झाली. यावेळी लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत आणि कंटेन्मेंट झोनमध्ये कठोर भूमिका घेण्याचा निर्णय झाला होता. कंटेन्मेंट भागात इन्सिडेंट कमांडर नेमून त्यांना मॅजिस्ट्रीयल अधिकार देणे शिवाय पोलीस, आरोग्य कर्मचाऱयांचे पथकही येथे नेमण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. याच वेळी कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात दुचाकीवरून फिरण्यासाठी देण्यात आलेली सूट मागे घेण्यात आली आहे. आतापर्यंत पास दिलेले कार आणि मालवाहू वाहनांना रस्त्यावर फिरण्यास अनुमती देण्यात आली आहे. अशा पासची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.
मद्यविक्रीबाबत 3 मे नंतरच निर्णय पब, बार, हॉटेल सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवाय बस संचारही बंद राहणार आहे. ज्या कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे त्यांना काही अटींवर बसेस वापरता येतील. 3 मे पर्यंत राज्यात जमावबंदी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे 3 मे नंतरच मद्यविक्रीबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मद्यपेमींना लॉकडाऊन संपेपर्यंत खूशखबर मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.