अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 1 डिसेंबर 2021, सकाळी 11.10
● जिल्ह्यात पाऊस, ढगाळ वातारणाने जेमतेम उपस्थिती
● शाळांत नियम पाळण्याचे व्यवस्थापनापुढे आव्हान
● नव्या व्हेरिएंटमुळे पालक संभ्रमात
● मात्र मुुलांच्यात शाळा सुरू झाल्याचा उत्साह
● बुधवारी नव्याने 18 रूग्ण वाढले
● 2 हजार 530 संशयितांच्या चाचण्या
सातारा / प्रतिनिधी :
आज 1 डिसेंबर 2021 वर्षातील शेवटच्या महिन्याला सुरूवात होत असतानाच कोरोनामुळे बंद असलेल्या पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा पुन्हा वाजली आहे. सातारा, कराड, फलटण, खटाव, माण, कोरेगांवसह जिल्ह्यात विशेषतः ग्रामिण भागातील पहिल्या दिवशी जेमतेम विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे फुले देऊन तर कुठे रांगोळी काढून स्वागत केले. जिल्ह्यात कोरोनाची लाट आटोक्यात असली तरी नव्या व्हेरिएंटच्या चर्चेने पालक संभ्रमावस्थेत आहेत. दरम्यान बुधवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने 18 रूग्ण वाढले आहेत तर 2 हजार 530 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत.
शाळा सुरू पण नियम पाळण्याचे आव्हान
राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे आज सकाळपासूनच शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. ‘तरूण भारत’ने प्राथमिक स्वरूपात काही शाळांची पाहणी केली असता विद्यार्थ्यांच्यात उत्साह असला तरी लहान मुलांना कोरोनाच्या नियमांच्या चौकटीत बसवताना शिक्षकांची कसरत सुरू होती. विशेषतः पहिली, दुसरी, तिसरीच्या मुलामुलींकडून नियमांची अमलबजावणी करून घेताना शाळा व्यवस्थापनाची काहीशी धांदल उडाल्याचे दिसत होते. मात्र कोरोनाचे संकट विसरून शाळेत पुन्हा आल्याचा आनंदही विद्यार्थ्यांच्यात होता. उपस्थिती मात्र जेमतेम होती.
अनोख्या स्वागताने विद्यार्थी भारावले
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षापासून पहिलीपासूनच्या मुलांच्यावर ऑनलाईन शिक्षणाचे ओझे होते. ऑफलाईन शिक्षण, खेळण्या बागडण्याच्या दिवसात अचानक ऑनलाईन शिक्षणाशी जुळवून घेताना शिक्षकांसह विद्यार्थी, पालकही मेटाकुटीला आले होते. मात्र आज शाळा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात अनेक शाळांमधे विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत झाले. कुठे फुलांची आरास होती तर कुठे फुग्यांची कमान होती. या अनोख्या स्वागताने विद्यार्थी भारावून गेले.
पालक इच्छुक पण संभ्रम कायम
जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आल्याने मुलांना शाळेत पाठवण्यास पालक इच्छुक आहेत. शाळांनीही सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझेशन यासह नियमांची अमलबजावणी केली आहे. मात्र नव्या व्हेरिएंटची चर्चा सुरू झाल्याने अनेक पालकांनी थोडे दिवस थांबून मुलांना शाळेत पाठवू असा निर्णय घेतल्याचे दिसून आले. यातच जिल्ह्यात वातावरणात झपाट्याने बदल झाल्याने मुलांच्यात किरकोळ आजारांचे प्रमाणही आहे. या पार्श्वभुमीवर अनेक पालकांनी संभाव्य परिस्थितीचा अंदाज निर्णय घेतल्याचे दिसते.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 23,00,316
एकूण बाधित 2,52,020
कोरोनामुक्त 2,44,496
एकूण मृत्यू 6,476
सक्रीय रुग्ण 219
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 18
कोरोनामुक्त 38
मृत्यू 00