मोहिमेची दहा दिवसातील आकडेवारी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात 20 लाख 29 हजार 480 जणांना कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी लसचा पहिला डोस देण्यात आला. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी कधी यायचे हे संबंधितांना विशिष्ट नंबरवरुन संदेश पाठवून कळविले जाणार आहे.
भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. ‘कोव्हिशिल्ड’ या पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेल्या तसेच ‘कोव्हॅक्सिन’ या भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसद्वारे लसीकरण सुरू आहे. भारतीय बाजारात खुल्या विक्रीसाठी कोव्हॅक्सिन ही लस 900 ते एक हजार रुपये या दराने मार्च 2021 पासून उपलब्ध होणार आहे. तसेच कोव्हिशिल्ड लस ऑगस्ट 2021 पासून एक हजार रुपये दराने बाजारात उपलब्ध होणार आहे. खुली विक्री सुरू झाल्यावर 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकाला लस खरेदी करुन डॉक्टरांच्या मदतीने लसीकरण करुन घेता येईल. विक्री सुरू झाल्यामुळे ज्यांना लवकर लस मिळणार नाही पण लसीकरण करुन घेण्याची इच्छा आहे त्यांची सोय होणार आहे.
लसीमुळे मृत्यूचे प्रमाण शून्य
लसीकरणाचा पहिला टप्पा सहा ते सात महिने चालणार आहे. पुढील कार्यक्रम जाहीर झालेला नाही. लसीकरण सुरू असले तरी अद्याप केंद्र सरकारला अपेक्षित असलेल्या वेगाने मोहीम सुरू झालेली नाही. याच कारणामुळे नागरिकांना वारंवार लस घेण्याचे आवाहन सुरू आहे. लस टोचून घेतल्यामुळे देशात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. ज्यांचा लस घेतल्यानंतर मृत्यू झाला त्यांच्या मत्यूचे कारण लस नाही, असेही सरकारने जाहीर केले.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
लसीमुळे शरीरात कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित करणारी प्रक्रिया सुरू होईल. मोठय़ा प्रमाणावर चाचण्या घेतल्यानंतर तसेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांचे पालन करुन लस वापरण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. लस बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केंद्र सरकारने नागरिकांना केले आहे.