15 महिलांच्या टीमसोबत मिळून करतात सुरक्षा
शिट्टीचा आवाज ऐकताच पळतात झाड तोडणारे
जमुई जिल्हय़ातील मंझियाना गावातील चिंता देवी पर्यावरण रक्षणासाठी अक्षरशः झटत आहेत. झाडांनाच सर्वस्व मानणाऱया चिंता देवी जंगल वाचविण्याचे काम करतात. मागील 20 वर्षांपासून जंगल बचाओ मोहिमेचे त्या नेतृत्व करत आहेत. जंगलझोड आणि खाणकाम करणाऱया लोकांमध्ये त्यांची दहशत आहे.
चिंता देवी यांनी या कामासाठी स्वतःसोबत 15 महिलांची टीम तयार केली आहे. सर्व महिला जंगलात गस्त घालतात. चिंता देवींची टीम वेळावेळी खाणमाफियांशी देखील वैर पत्करतात. अनेकदा त्यांनी स्वतःच्या टीमसोबत मिळून खाणमाफियांना पळवून लावले आहे. आरोपींना पकडल्यावर त्या वन विभागाच्या अधिकाऱयांना कळवितात. चिंता देवी यांची टीम गुरिल्ला रणनीतिवर काम करते. जंगलात छुप्या मार्गाने करडी नजर ठेवली जाते. अवैध कामाचा संशय येताच शिट्टी वाजवून सर्व महिलांना एकत्र केले जाते. अनेकदा अवैध काम न थांबविणाऱया आरोपींना बडविले देखील जाते.
9 लाख रोपांची लागवड
जंगल आणि पर्यावरण वाचविण्यासाठी चिंता देवी यांनी सुमारे 9 लाख रोपांची लागवड केली आहे. 2001 मध्ये निसर्ग वाचविण्यासाठी या कामात सामील झाले होते. कोलकात्यात अशाप्रकारे टोळी तया करून पर्यावरण वाचविण्याचे काम करताना पाहिले होते. तिथूनच मला प्रेरणा मिळाला. वृक्षांना मी माझ्या मुलांप्रमाणे मानत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अनेक संस्थांकडून गौरव
जंगल वाचविण्याच्या या मोहिमेमुळे चिंता देवी यांना अनेक पुस्कार देखील मिळाले आहेत. सरकारी संस्था आणि एनजीओंकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. चिंता देवी यांचे नाव आता पर्यावरणतज्ञ म्हणूनही घेतले जाते. जंगल वाचविण्यासंबंधीच्या अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांना निमंत्रित केले जाते.