वायुदल प्रमुखांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदल आगामी दोन दशकांमध्ये सुमारे 350 विमानांच्या खरेदीवर विचार करत आहे. वायुदलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी बुधवारी यासंबंधी माहिती दिली आहे. भारतीय एअरोस्पेस क्षेत्र विषयावरील एका संमेलनात वायुदल प्रमुखांनी स्वतःच्या संबोधनात चीनकडून निर्माण होणाऱया आव्हानांच्या पार्श्वभूमीवर वायुदलाच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी विषम क्षमतांना विकसित करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
उत्तरेकडील शेजारी देश पाहता आमच्याकडे सर्वोत्तम दर्जाचे तंत्रज्ञान असायला हवे, सुरक्षेच्या कारणास्तव हे तंत्रज्ञान देशातच निर्माण केले जाण्याची गरज आहे. भारतीय वायुदल पुढील दोन दशकांमध्ये देशातूनच सुमारे 350 विमानांच्या खरेदीचा विचार करत असल्याचे म्हणत भदौरिया यांनी संरक्षण क्षेत्रात देश आत्मनिर्भर होण्याची गरज व्यक्त केली आहे. तेजस लढाऊ विमान प्रकल्पाने भारतातील एअरोस्पेस उद्योगात विश्वास जागविला असल्याचे ते म्हणाले.