मुख्यमंत्री बोम्माई यांची घोषणा : शेतकऱयांना दिलासा देण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात लम्पी स्कीनचा फैलाव होत असून जनावरे दगावत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱयांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. लम्पी स्कीनमुळे जनावरे दगावल्यास 20 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार देणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
उत्तर कर्नाटकासह काही जिल्हय़ांमध्ये लम्पी स्कीनमुळे जनावरे दगावत आहेत. प्रामुख्याने बेळगाव तालुक्यात हे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. जनावरे दगावलेल्या शेतकऱयांना मदत द्यावी, अशी मागणी होत होती. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. गुरुवारी हावेरीतील गुरुभवन येथे हावेरी जिल्हा निर्मितीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्र आयोजित रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे मुख्यमंत्री बोम्माई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी त्यांनी लम्पी स्किनचा फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. याकरिता जागृती पथक ठिकठिकाणी पाठवून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सध्या शेतकऱयांच्या कृषी पंपसेटना 5 तास वीज पुरवठा केला जात असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. शेतकऱयांनी वीज पुरवठय़ाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बेंगळूरला परतल्यानंतर आपण अधिकाऱयांशी चर्चा करून 7 तास वीज पुरवठा करण्यासाठी ठोस उपाययोजना करणार आहे. वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण केले जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.