वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
1 जूनपासून 2020 पासून 200 विशेष रेल्वे धावणार आहेत. अनलॉक-1 च्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या रेल्वेगाडय़ा श्रमिक विशेष रेल्वेगाडय़ांच्या व्यतिरिक्त असणार आहेत. या रेल्वेगाडय़ांचे तिकीट आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपसह रिझर्व्हेशन काउंटर आणि तिकीट एजंट्सकडून प्राप्त करता येणार आहे. या रेल्वेगाडय़ा पूर्णपणे आरक्षित राहणार असून यात वातानुकुलित आणि विनावातानुकुलित दोन्ही प्रकारचे डबे असणार आहेत. तर जनरल डब्यात बसण्यासाठीही आसने असतील. या रेल्वेगाडय़ांमध्ये आरक्षण 30 दिवसांऐवजी 120 दिवसांपूर्वी करता येणार आहे. प्रवासादरम्यान संबंधिताला उतरू पाहणाऱया शहराचे नाव नमूद करावे लागणार आहे. कुठलीही समस्या उद्भवल्यासह हेल्पलाईन क्रमांक 139 आणि 138 वर संपर्क करता येणार आहे.
गंभीर आजाराने त्रस्त लोक, गरोदर महिला आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना अत्यंत आवश्यक कारण असेल तरच प्रवास करा अशी सूचना रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केली आहे. रेल्वे मंत्रालयानेही केवळ आवश्यकता असेल तरच प्रवास करण्यास सांगितले आहे.
खबरदारीच्या सूचना…
-केवळ कन्फर्म/आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांना स्थानकात येण्याची तसेच रेल्वेत प्रवेशाची अनुमती मिळणार.
प्रवाशांना रेल्वे रवाना होण्याच्या 90 मिनिटांपूर्वी रेल्वेस्थानकावर पोहोचवावे लागणार.
-रेल्वेस्थानकावर प्रवेश तसेच बाहेर पडताना स्क्रीनिंग होईल. याचबरोबर सदैव मास्क परिधान करावे लागणार.
-रेल्वे प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारचे कॅटरिंग शुल्क आकारणार नाही.
-रेल्वेत प्रवाशांना ब्लँकेट, चादर किंवा उशी मिळणार नाही.
-प्रवाशाने आरोग्य सेतू इन्स्टॉल करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
सर्व प्रवाशांना मिळणार आसन
200 विशेष रेल्वेगाडय़ांचे प्रवासभाडे सामान्य असेल. आरक्षित असल्याने जनरल डब्यांसाठी सेकंड सीटिंगचे (2एस) प्रवासभाडे आकारले जाणार आहे. तसेच सर्व प्रवाशांना आसन उपलब्ध केले जाणार आहे. या रेल्वेगाडय़ांमध्ये पार्सल आणि सामानाचेही बुकिंग होऊ शकेल.