टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा अष्टपैलू हसन अलीचा दावा,
कराची / वृत्तसंस्था
आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत सलामीलाच होणाऱया भारताविरुद्धच्या लढतीत 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील विजयाची पुनरावृत्ती करू, असा दावा पाकिस्तानचा अष्टपैलू हसन अलीने केला. पाकिस्तानचा संघ त्या लढतीनंतर 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये दोनवेळा भारताविरुद्ध भिडला आणि या दोन्ही लढतीत पाकिस्तानचा पराभव झाला, याकडे मात्र त्याने दुर्लक्ष करणे पसंत केले. चॅम्पियन्स चषकानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात 2018 मध्ये दुबईत आशिया चषकात तर 2019 मध्ये मँचेस्टरमध्ये विश्वचषकात सामने झाले आहेत.
प्रत्येक आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तानचे संघ आमनेसामने भिडतात, त्यावेळी त्याबद्दल प्रचंड उत्सुकता असते. मात्र, आजवर पाकिस्तानचा संघ विश्वचषकात भारताला एकदाही पराभूत करु शकलेला नाही. आश्चर्य म्हणजे विश्वचषकातील सराव सामन्यात देखील पाकिस्तान भारताला पराभूत करु शकलेला नाही.
‘आम्ही 2017 मध्ये चॅम्पियन्स चषक जिंकला, त्यावेळी तो आमच्यासाठी अतिशय उत्तम अनुभव राहिला आणि आताही टी-20 विश्वचषकात त्याच निकालाची पुनरावृत्ती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. भारताविरुद्ध खेळताना नेहमीच दडपण असते. अपेक्षाही प्रचंड असतात. आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ साकारण्याचा प्रयत्न करु’, असे हसन याप्रसंगी म्हणाला.
‘जे लोक एरवी क्रिकेट फारसे फॉलो करत नाहीत, ते देखील भारत-पाकिस्तानचे सामने शेवटपर्यंत पाहतात. अशा असंख्य बाबींमुळे खेळाडूंवर प्रचंड दडपण असते आणि ते झुगारुन खेळणे आवश्यक असते’, याचा त्याने येथे उल्लेख केला.
मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक व गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी राजीनामा दिल्याने आम्हा सर्वांचीच निराशा झाली आहे, असे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. विश्वचषक उंबरठय़ावर असतानाच त्यांनी राजीनामा देणे योग्य ठरत नाही. विशेषतः वकार माझ्यासाठी रोल मॉडेल आहे आणि त्याचे प्रशिक्षण मिळणार नाही, याची खंत वाटते, असे तो पुढे म्हणाला. फिलँडर अनुभवी असला तरी इतक्या कमी वेळेत संघाला त्याच्याशी कसे जुळवून घेता येणार, हे महत्त्वाचे ठरेल, असेही त्याने सांगितले.
उद्या किवीजविरुद्ध लढत
विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्धची मालिका आव्हानात्मक असेल, असे हसन अली शेवटी म्हणाला. न्यूझीलंडचा संघ 18 वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानी भूमीत खेळणार असून उभय संघात 3 वनडे व 5 टी-20 सामने होणार आहेत. उद्या (शुक्रवार दि. 17) दोन्ही संघात रावळपिंडीमध्ये पहिल्या वनडे लढतीने या मालिकेला प्रारंभ होईल.