मिरज तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, एकरी 35 हजार नुकसान भरपाई द्या
प्रतिनिधी/मिरज
कोरोनामुळे भयभीत झालेल्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे तर प्रचंड हानी झाली आहे. त्यामुळे 2020 हे वर्ष आपत्ती वर्ष जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ एकरी 35 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मिरज विधानसभा क्षेत्राचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केली. मंगळवारी आमदार खाडे यांनी मिरज तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतला. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, शासनाने मदत देण्यास दिरंगाई केल्यास, सांगली जिल्ह्यात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.