सत्ताधारी असो अथवा विरोधी पक्ष, 2022 हे सगळय़ांनाच संमिश्र राहिले. काही कडू, काही गोड. गुजरातमधील जंगी विजयाने नरेंद्र मोदी यांचा जलवा कायम दिसला. विरोधी पक्षात देखील अजून ताकत शिल्लक आहे, याचा प्रत्यय हिमाचल प्रदेशमध्ये आला. ‘मिनी इंडिया’ म्हणून समजल्या जाणाऱया राजधानी दिल्लीच्या महानगरपालिका निवडणुकात आम आदमी पक्षाने भाजपला पदभ्रष्ट करून हवा हळूहळू बदलत आहे, असे भासवले.
लोकसभा निवडणूक पंधरा महिन्यांवर येऊन ठेपली असताना चित्र बदलत आहे. ते किती बदलणार आणि कितपत बदल होणार, याची चुणूक नवीन वर्षात दिसणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड या चार राज्यांसकट दहा राज्यांच्या निवडणूका पुढील वर्षात होत आहेत. या चार राज्यात तरी भाजप विरुद्ध काँग्रेस असा कडा मुकाबला होणार आहे. तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या प्रादेशिक पक्षाला एकीकडे भाजप तर दुसरीकडे काँग्रेसशी दोन हात करावे लागणार आहेत. विरोधी पक्षात किती दम आहे, ते दिसणार आहे. जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूका देखील येत्या वर्षात होणे अपेक्षित आहे. वादग्रस्त 370 कलम रद्द करून तीन वर्षे उलटली असली तरी स्थानिक प्रश्न सुटले नसल्याने सत्ताधारी अस्वस्थ झाले आहेत. राहुल गांधींना दूषणे देत काँग्रेस सोडलेले माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यादेखील नवीन पक्षाला बाळसे येत नाही आहे. ‘काश्मीर फाइल्स’ चा कितीही गवगवा झाला तरी सध्याची तेथील परिस्थिती निराळीच भासत आहे. 2022 मध्ये पंजाबमध्ये काँग्रेसचा पाडाव करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इतिहास घडवला. भगवंत मान या पुर्वश्रमीच्या विनोदवीराला मुख्यमंत्री बनवण्यात आले खरे पण तेथील सरकार यथातथाच सुरु आहे. ज्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या माकडचेष्टामुळे काँग्रेस डबघाईला आली ते सध्या एका जुन्या खटल्यात तुरुंगात गेले आहेत तर औटघटकेचे मुख्यमंत्री ठरलेले चरणजित सिंग चन्नी हे बरेच महिने कॅनडाला गायब झाले होते. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आता भाजपमध्ये आहेत. थोडक्मयात काय तर पंजाबमध्ये आनंदीआनंद आहे. असे असूनदेखील केजरीवाल यांचा पक्ष गुजरातमध्ये फार थाटात निवडणूक लढला आणि त्याच्या लढण्याने एकीकडे भाजपची चांदी झाली तर दुसरीकडे काँग्रेसची धुळधाण उडाली. आम आदमी पक्ष त्यामुळे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यतेला प्राप्त झाला. विरोधी पक्षांशी फटकळपणे वागणाऱया या महत्त्वाकांक्षी पक्षाने असेच धोरण चालू ठेवले तर तो राष्ट्रीय पातळीवर ‘वोट कटवा’ ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सरत्या वर्षात योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश राखण्यात यश मिळवले असले तरी मोदींच्या नेतृत्वामुळे ते शक्मय झाले, असाच संदेश गेला.
सरत्या वर्षात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाशी अचानक पुन्हा घरोबा करून भाजपला चकित केले तर महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेत फूट पाडून उद्धव ठाकरे सरकार घालवले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असले तरी ‘रिमोट कंट्रोल’ देवेन्द फडणवीस यांच्या हातातच आहे, असे दिसत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वेगवेगळय़ा प्रकारे गोंधळ घातल्याने ‘हे अमेझॉन पार्सल परत घेऊन जा’ असे विरोधक केंद्राला सांगू लागले. बंगालचे राज्यपाल म्हणून वादात राहिलेले जगदीप धनकर यांचे मात्र सरत्या वर्षात भले झाले. ते थेट उपराष्ट्रपती झाले. गमतीची गोष्ट अशी, की ज्या ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचा सवतासुभा राहिला त्यांनी व त्यांच्या पक्षाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत धनकर यांना पाठिंबा देऊन विरोधी पक्षांची गोची केली. ‘मोदी चांगले, अमित शहा वाईट’ असा नवीन सिद्धांत मांडून दीदी थोडय़ा भाजपकडे सरकलेल्या दिसल्या. राष्ट्रपतीपदाची स्वप्ने बघत असलेल्या वेंकय्या नायडू या माजी उपराष्ट्रपतीची वाटचाल मार्गदर्शक मंडळाकडे सुरु झाली. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती बनवून मोदींनी आदिवासी कार्ड खेळले.
भाजपचे माजी अध्यक्ष राहिलेले आणि मोदी सरकारमधील एक अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून मान्यता पावलेले नितीन गडकरी यांचे राजकीय अवमूल्यन करण्यासाठी त्यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळातून वगळण्यात आले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावरदेखील अशीच कुऱहाड चालली. हिमाचल प्रदेश हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य. तेथील पराभवाचे खापर मात्र माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यावर फोडले गेले. केन्दीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या लोकसभा मतदारसंघाचे भाग असलेल्या पाचही विधानसभा मतदारसंघात भाजप हारले. सुखविंदर सिंग सुखू या सामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवून काँग्रेसने आपण थोडे बदलत आहोत, असा संदेश दिला. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस अध्यक्ष झाले. सत्ताकेन्द गांधी घराण्याकडेच राहिले असले तरी काँग्रेसने एक दलित चेहरा पुढे केला. नड्डा आणि खर्गे अशी तुलना केली तर खर्गे सरस असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. गुजरातमधील भाजपच्या विक्रमी विजयाचे श्रेय जसे पंतप्रधानांचे आहे तसेच तेथील प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचे आहे. मूळचे महाराष्ट्रीयन असलेले पाटीलसाहेब हे गुजरातमधील खरे मुख्यमंत्री मानले जातात. साक्षात पंतप्रधानांनी त्यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ असे संबोधून त्यांचा गौरव केला आहे. तात्पर्य काय तर अमित शहा यांना गुजरातमधून एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला आहे. भूपेंद्र पटेल हे एक बुजगावणे आहेत आणि पटेल समाजाला खूष करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन मोदींनी एक षट्कारच ठोकला आहे असे मानले जाते.
ज्याना ‘पप्पू’ भासवून भाजपने गेली 8-10 वर्षे आपली राजकीय पोळी शेकली ते राहुल गांधी सरत्या वर्षात एक नेता म्हणून उदयाला आले. त्यांनी सुरु केलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर अशा ‘भारत जोडो’ यात्रेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद काँग्रेसची संजीवनी बनला आणि त्याने मोदी विरोधकांमध्ये एक आशेचा किरण निर्माण केला. महागाई, बेकारी, वाढती विषमता असे मुद्दे जास्त चर्चिले जाऊ लागले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी त्यांचे आमदार पुत्र आणि अभिनेते उदयनीधी यांना मंत्री बनवून आपला तोच वारस असे एक प्रकारे जाहीर केले. बिहारमधील राजकीय उलथापालथीमुळे तेजस्वी यादव परत उपमुख्यमंत्री बनले. आपला मुलगा आणि तेलंगणातील एक मंत्री के. टी. रामाराव यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर राव यांनी आपल्या तेलंगणा राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय स्वरूप दिले. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर राव साहेबांना राष्ट्रीय राजकारण करायचे आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपली घाग नेता अशी प्रतिमा दणक्मयात राखली तर सचिन पायलट यांना गांधी घराण्याचा पाठिंबा असूनही पायउतार करता आले नाही. संजय राऊत यांना तुरुंगात डांबल्यामुळे त्यांचा राजकीय कद वाढला. महुआ मोईत्रा यांनी संसद गाजवली. दगाबाजीनंतर झालेले सत्तांतर आणि शिवसेनेतली फूट यातून आदित्य ठाकरे यांचा नेता म्हणून उदय झाला. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राजकारणात उडी मारली तरी ते अजून चाचपडत आहेत. पक्ष काढणे, बांधणे, चालविणे, वाढविणे हे किती कठीण आहे हे या किंग मेकरला आता कळले असेल. दिवंगत राम विलास पासवान यांचे पुत्र व राजकीय वारस चिराग पासवान यांना अस्तित्व टिकविण्यासाठी भाजपकडे जाण्याशिवाय पर्याय दिसत नाही तर महाराष्ट्रातले राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांना वलय असले तरी त्यांचा पक्ष निवडणुकीत उठत नाही. भाजपला पुढचा धोका तेजस्वी यादव, अखिलेश यादव, राहुल गांधी, केजरीवाल यांच्याकडून होईल कारण त्यांच्यासमोर भाजपचे नेतृत्व जुने दिसण्याची शक्मयता आहे. राजकारण म्हणजे बदल. जो कोणी जास्त बदलेल तो पुढे जाईल.
सुनील गाताडे