वृत्तसंस्था/ सिडनी
2023 साली भारतात होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी कर्णधार ऍरॉन फिंचने आपल्या पूर्वतयारीला प्रारंभ केला आहे. सदर स्पर्धेला अद्याप अडीच वर्षांचा कालावधी बाकी असताना या स्पर्धेसाठी आपल्या पूर्वतयारीमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची संघ खातरजमा करुन घेईल, असे फिंच म्हणते.
गेल्यावर्षी म्हणजे 2019 साली आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये झाली होती. यजमान इंग्लंडने या स्पर्धेचे पहिल्यांदाच विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाला उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. या पराभवापासून बोध घेण्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा प्रयत्न असेल.
भारतात होणाऱया या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाला जेतेपद मिळविणे सोपे नाही याची चांगली कल्पना आहे. खडतर परिश्रम, कसून सराव आणि परिस्थितीनुसार डावपेच यांची आखणी योग्य तऱहेने करण्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा प्रयत्न राहील, असेही फिंच म्हणाला.
जागतिक स्तरावरील सुरू असलेल्या कोरोना महामारी संकटामुळे क्रिकेटच्या हालचाली सध्या ठप्प झाल्या आहेत. गेल्या मार्चनंतर क्रिकेट स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत.
मागील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने सात वनडे सामने खेळले असून त्यापैकी तीन सामने गमविले आहेत. गेल्या मार्चच्या मध्यंतरी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका कोरोना महामारीमुळे अर्धवट स्थितीत सोडून द्यावी लागली. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार असली तरी कोरोनामुळे या स्पर्धेवर अद्याप अनिश्चितेचे सावट आहे. कदाचित ही स्पर्धा लांबणीवर टाकली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे पण ऑस्ट्रेलियन संघासमोर टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे पहिले लक्ष राहील.
भारतातील स्पर्धेदरम्यान येथील खेळपट्टय़ा आणि वातावरण यांच्याशी जुळवून घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कसरत करावी लागेल. त्यामुळे आतापासून कर्णधार फिंचने विविध आराखडय़ांना प्रारंभ केला आहे. 33 वर्षीय फिंच या आगामी स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करण्यासाठी उत्सूक आहे. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाला दर्जेदार दोन फिरकी गोलंदाजाचा शोध घ्यावा लागेल. ऑस्ट्रेलियातील 25 खेळाडूंची या स्पर्धेसाठी निवड करून त्यांच्या तयारीला लवकरच प्रारंभ करण्यात येईल, असे कर्णधार फिंचने म्हटले आहे.
भारतातील खेळपट्टय़ा फिरकी गोलंदाजीला अधिक अनुकूल राहतील पण काही खेळपट्टय़ा फलंदाजीला अनकूल असल्याने संघाला 300 पेक्षा अधिक धावांचा टप्पा गाठावा लागेल. या आगामी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात दोन दर्जेदार फिरकी गोलंदाज आणि एक जादा अष्टपैलूचा समावेश असावा, याचाही त्याने उल्लेख केला आहे.