आयईएसएच्या अहवालात माहिती सादर- आगामी काळात इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला अच्छे दिन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामधील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ येत्या 2027 पर्यंत वेगाने वाढत जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये प्रतिवर्ष जवळपास 63 लाख वाहनांपेक्षा अधिकची वाहन विक्री होणार असल्याची माहिती इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स (आयइएसए) यांच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार देशातील इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर आणि सार्वजनिक चार्जिंग केंद्रांच्या वाढत्या संख्येमुळे बाजारात बॅटरीची मागणी वेगाने वाढत जाणार असल्याचे संकेतही आहेत. यामध्ये 2020 ते 2027 च्या दरम्यान इ-वाहनांची बाजारपेठ 44 टक्क्यांच्या सीएजीआरमधून वाढण्याचा अंदाज आहे. 2027 पर्यंत हा आकडा 6.34 दशलक्ष युनिट वार्षिक विक्री होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
बॅटरीची मागणी 32 टक्क्यांनी वाढणार
वर्ष 2027 पर्यंत वर्षाच्या आधारे बॅटरीची मागणी 32 टक्क्यांनी वधारुन 50जीडब्लूएच याला हिट करण्याचा अंदाज आहे. यामध्ये 40 पेक्षा अधिक जीडब्लूएच लिथियम-आर्यनचा वापर बॅटरीवर होणार असल्याची माहिती आहे. 2019 मध्ये निश्चित केलेल्या अंदाजानुसार बॅटरी बाजार 580 दशलक्ष डॉलर्सचा राहिला आहे, जो 2027 पर्यंत 14.9 अब्ज डॉलर्सने वाढण्याचा अंदाज आहे.
इ-रिक्षाला पसंती
पर्यावरण संरक्षणासह हवामान बदलामुळे आगामी काही वर्षांमध्ये इंधनावरील वाहने घटत जात इ-वाहनांची संख्या वेगाने वाढत जाणार असल्याची माहिती विविध अहवालामधून समोर येत आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या काही वर्षांत इ-रिक्षाला सर्वाधिक पसंती मिळण्याची माहिती आहे, कारण रायपूर, इंदोर, भोपाळ यासारख्या शहरात इ-रिक्षांचा वापर सुरू झाला आहे. दक्षिण आणि उत्तर पूर्व भागात नव्या शहरांमध्ये इ-रिक्षांचा विस्तार होण्याचे संकेत आहेत.