वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जर्मनीतील हॅनओव्हर येथे सोमवारी झालेल्या कर्णबधिरांच्या विश्वनेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताने 7 सुवर्ण पदकांसह 21 पदकांची लयलुट करत पदक तक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
भारतीय स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये 7 रौप्य आणि 7 कास्य पदके मिळविली आहेत. या जागतिक स्पर्धेत युक्रेनचा संघ 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 6 कास्य पदकांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. यजमान जर्मनीला पदक तक्त्यात तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जर्मनीने 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कास्य पदक मिळविले आहेत. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला नेमबाज माहीत संधूने महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझीशन प्रकारात सुवर्णपदक घेतले. त्याच प्रमाणे पुरूषांच्या 25 मीटर स्टॅन्डर्ड पिस्तुल नेमबाजीत भारताच्या अभिनव देसवालने सुवर्ण तसेच याच क्रीडा प्रकारात भारताच्या चेतन सपकाळने कास्य पदक घेतले. या संपूर्ण स्पर्धेत भारताच्या 13 नेमबाजांनी आपला सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेमध्ये 16 देशांचे सुमारे 70 स्पर्धक सहभागी झाले होते. भारताचा नेमबाज देसवालने एकूण 5 पदकांची कमाई केली असून त्यात 1 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांचा समावेश आहे. संधूने 3 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक रायफल नेमबाजीत मिळविले. धनुष्य श्रीकांतने 10 मी. एअर रायफल वैयक्तिक आणि मिश्र प्रकारात 2 सुवर्णपदकांची कमाई केली. भारताच्या महिला नेमबाज अनुया प्रसादने 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत, शौर्या सैनीने पुरूषांच्या 50 मी. थ्री पोझीशन प्रकारात सुवर्णपदके मिळविली.