वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते आणि गतकाळातील अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसचे 21 नेते आपल्या संपर्कात असल्याचे प्रतिपादन केले आहे. हे प्रतिपादन त्यांनी कोलकाता येथील भाजपच्या कार्यालयात पत्रकारांना मुलाखत देत असताना केले. हे सर्व नेते आमदार असून ते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. काही कालावधी गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप घडणार आहे, असेही भाकित मिथुन चक्रवर्ती यांनी केले.
तृणमूलमधील आमदारांना भाजपमध्ये घेण्यास भाजपमधीलच काही नेत्यांचा विरोध असला तरी कालांतराने तो मावळणार आहे. तृणमूलमध्ये भाजपबद्दल सहानुभूती वाढत आहे. त्यामुळे येत्या काही काळात तृणमूलला गळती लागू शकते, असे भाकित त्यांनी केले. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदी यांनी ईडीचा दुरुपयोग करत नाहीत, असे विधान केले होते. त्याचे त्यांनी समर्थन केले.