ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळय़ांना कळून चुकले आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज असून, यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक सदरातून करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या विकासात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे काहीच योगदान नाही. देवेंद्र फडणवीस हेच सर्वत्र दिसत आहेत. देशाच्या राजधानीतही शिंदेंचा प्रभाव नाही. शिंदेंच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा हा खोटा आहे. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील, असे भाजपचे नेते सरळ सांगतात, असे घडले तर शिंदेंनी काय मिळवले? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.
अधिक वाचा : राज्यातील पोलीस भरती लवकरच, पुण्यातून 800 जणांना संधी
शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज असून यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार? असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले असता शिंदे यांचा रामदास आठवले होईल, असे तो म्हणाला. कारण भाजच्या मेहेरबानीवर शिंदेंचे मुख्यमंत्रीपद आणि राजकीय अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे भाजप शिंदे यांना गुदगुल्या करीत मारेल. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भाजपने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळय़ांना कायमचे गुलाम करून ठेवले. शिंदे सरकारची स्थिती ओल्या बाळंतिणीसारखी आहे. थोडा वेळ देऊ त्यांना. बाकी पुढे पाहू, असा दावाच सेनेनं केला आहे.