नागरिकांची गैरसोय : स्मशानभूमी निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन करणार प्रयत्न, काही ग्रा. पं.जागांवर अतिक्रमण
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध विकास योजना राबविल्या जात आहेत. मात्र स्मशानभूमीच्या निर्मितीसाठी म्हणावे तसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे अनेक ग्राम पंचायती स्मशानभूमीविना आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजतागायत 233 हून अधिक ग्राम पंचायतींना स्मशानभूमीच नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे रस्त्याशेजारी, नदीकिनारी आणि शेतात मृतदेह दफन करावे लागत आहेत.
राज्यात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बेळगाव ग्रामीण भागात ही परिस्थिती आहे. काही स्मशानभूमींचा विस्तार झाला नाही. त्यामुळे दफन केलेल्या ठिकाणीच पुन्हा शव दफन करावे लागते, अशी बिकट परिस्थिती काही स्मशानभूमीत आहे. बहुतांशी गावांमध्ये सरकारी जागा आहेत. मात्र त्या काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्या आहेत. तर काही जागा कृषी व वनखात्याच्या मालकीच्या आहेत. या जागा अद्याप महसूल हस्तांतरित झाल्या नाहीत. दरम्यान खासगी मालकांकडून जमिनी हस्तांतरासाठी जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन प्रयत्न करीत आहेत.
जमीनमालकाकडून बाजारभावापेक्षा दुप्पट दराची मागणी
शेतकरी, जमीनमालक बाजारभावापेक्षा दुप्पट दराची मागणी करीत आहेत. त्यामुळे खेडोपाडी स्मशानभूमी उभारण्यात अडचणी येत आहेत. 1991 ते 2021 पर्यंत जिल्हय़ात 250 हून अधिक नवीन सार्वजनिक स्मशानभूमी उभारण्यात आल्या आहेत. मागील काही वर्षांपासून प्रत्येक समाजाला वेगळी स्मशानभूमी द्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र प्रत्येक समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी देणे शक्मय नाही, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.
काही ग्रामपंचायती स्मशानभूमीची देखभाल आणि व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे खासगी मालकांकडून स्मशानभूमीत अतिक्रमण होत आहे. तर काही स्मशानभूमीमध्ये देखभालीअभावी झाडे-झुडुपे वाढली आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार करणे अवघड झाले आहे. काही स्मशानभूमी वापराविना पडून आहेत. दरवषी स्मशानभूमीच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. ग्रामीण भागातील काही स्मशानभूमीमध्ये विजेची सोय नाही. त्यामुळे अंधारातच अंत्यविधी करावा लागत आहे.
खासगी जमीन विकत घेऊन स्मशानभूमी उभारणार
ग्रामीण भागातील ज्या गावांमध्ये जागा नाही. त्या ठिकाणी खासगी जमीन विकत घेऊन स्मशानभूमी उभारल्या जाणार आहेत. जिल्हय़ातील प्रत्येक गावात स्मशानभूमीच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार आहे.
– नितेश पाटील (जिल्हाधिकारी)