मात्र गळत्या निवारणाकडे दुर्लक्ष; हजारो लिटर पाणी वाया : एल ऍण्ड टी कंपनीच्या कारभाराबद्दल नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी जलवाहिनी घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरवासियांना 24 तास पाणी मिळणार ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र सध्या विविध ठिकाणी लागलेल्या गळत्यांकडे एल ऍण्ड टी कंपनीने कानाडोळा केला आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गळती निवारणाकडे दुर्लक्ष करण्यामागचे गौडबंगाल काय? असा मुद्दा उपस्थित होत आहे.
24 तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नवीन योजना राबविण्यासाठी एल ऍण्ड टी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र नियमितपणे पाणीपुरवठा करण्याची जबाबदारीदेखील या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. पाणीपुरवठा करताना उद्भवणाऱया समस्यांचे निवारण करणे आणि जलवाहिन्यांना लागलेल्या गळत्यांचे निवारण करण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. मात्र केवळ जलवाहिन्या घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून गळती निवारण करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरात विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागली असून विशेषतः व्हॉल्वद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे.
गणपत गल्ली कॉर्नर, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली कॉर्नर, येळ्ळूर रोड, वडगाव, आनंदनगर तसेच रामघाट रोड अशा ठिकाणी गळती लागल्याने पाणी वाया जात आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी करूनही याची दखल घेण्यात आली नाही. या व्यतिरिक्त शहरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळत्या लागल्या असून दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे पाणी वाया जावून नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. गळतीमुळे अपुरा पाणीपुरवठा करण्याचा प्रकार सुरू असल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एल ऍण्ड टी कंपनीने जलवाहिन्यांच्या गळती निवारणाचे काम हाती घेऊन सुरळीत व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.