प्रतिनिधी/ रत्नागिरी :
जिल्हय़ात कोरोनाचा उद्रेक झाला असून बुधवार सायंकाळपासूनच्या 24 तासात जिल्हय़ात 102 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत एका दिवसात आढळलेली ही सर्वोच्च रूग्ण संख्या असून जिल्हावासीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, 24 तासांच 5 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बळींची एकूण संख्या 49 झाली आहे.
बुधवार सायंकाळपासून सापडलेल्या रूग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालयात नमुने घेतलेले 24, कामथे 48, दापोली 2, घरडा, खेड 27 व लांजातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे पॉझटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 1438 झाली आहे.
45 जण कोरोनामुक्त
गुरूवारी 45 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 858 झाली आहे. गुरूवारी डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 6, दापोली 3, समाजकल्याण रत्नागिरी 2, घरडा खेड 21, वेळणेश्वर गुहागर 3 आणि पेंढांबे येथील 10 जणांचा समावेश आहे.
बुधवारी रात्री उशीरा व गुरूवारी सायंकाळी आलेल्या अहवालांनुसार राजापूर येथील एका 65 वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच रत्नागिरी येथे ऍन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह आलेल्या 68 वर्षीय महिला रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच खेड येथे 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांचे अनुक्रमे वय 71 व 40 वर्षे अशी आहेत. तसेच चिपळूण येथे 49 वर्षीय कोरोना रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या आता 49 झाली आहे. यात दापोली तालुक्यात सर्वाधिक 11 जणांचा मृत्यू झाला असून रत्नागिरी-चिपळुणात प्रत्येकी 9, खेड व संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 6, राजापूर 3, लांजा-गुहागरात प्रत्येकी 2 तर मंडणगडात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक कंटेन्मेंट झोन चिपळुणात
जिह्यात सध्या 131 ऍक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून त्यात सर्वाधिक 61 चिपळुण तालुक्यात आहेत. रत्नागिरी तालुक्यात 21, दापोले 5, खेड 24, लांजा 6, मंडणगड 3, गुहागर 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
546 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 15 हजार 244 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील 1438 अहवाल पॉजिटीव्ह तर 13 हजार 295 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आणखी 546 नमुन्यांचा अहवाल प्रलंबीत आहे.
चिपळुणात 9 वा बळी
चिपळुण शहरातील 57 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्धाचा गुरूवारी जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. तालुक्यातील हा 9 वा बळी आहे. शहरातील एका वकीलाबरोबर ते काही दिवसांपूर्वी मुंबईला जाऊन आले होते. त्यानंतर त्यांना ताप आल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रकृती बिघडल्याने चार दिवसांपूर्वी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रत्नागिरीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या संपर्कातील पत्नी, मुलासह वकीलालाही लागण झाली आहे. या सर्वांवर पेढांबे कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
राजापूरात कोरोनाचा तिसरा बळी
राजापूर शहरातील एका व्यापाऱयाचा बुधवारी रात्री उशीरा मृत्यु पश्चात अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाचा हा तिसरा बळी ठरला आहे. तालुक्यात आतापर्यंत 64 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. 58 जण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. आता केवळ 3 जण उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली आहे.