रोज एकच सामना रात्री 7.30 वाजता सुरू होणार, 57 दिवस स्पर्धेचा कालावधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 29 मार्च रोजी या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेची सुरुवात होणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना 24 मे रोजी होणार आहे. यावेळी एका दिवशी दोन सामने घेण्याचे प्रमाण कमी करण्यात आले असून सामने रात्री 7.30 पासून सुरू करण्यात येणार आहेत.
या घडामोडीबद्दल माहिती असणाऱया सूत्राने सांगितले की, 57 दिवसांची ही दीर्घ स्पर्धा असल्याने दिवसाला एकच सामना खेळविण्यात येणार आहे. ‘या स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक अद्याप तयार झालेले नाही. पण अंतिम सामना 24 मे रोजी होणार हे निश्चित आहे. यावर्षी या स्पर्धेला दीर्घ काळाचा ‘विंडो’ मिळाला असल्याने प्रत्येक दिवशी एकेक सामनाच घेण्यात येईल. त्यामुळे वेळापत्रक तयार करतानाही फारशी अडचण येणार नाही,’ असे या सूत्राने सांगितले.
प्रक्षेपण करणाऱयांना यातील सामने लवकर सुरू व्हावेत, असे वाटत होते. त्यांची ही इच्छा पूर्ण होणार असून रात्री 7.30 वाजता प्रत्येक सामना सुरू केला जाणार आहे. पण यामुळे फक्त ब्रॉडकास्टर्सचीच सोय होणार असे नसून सामने रात्री उशिरापर्यंत लांबणार नसल्याने शौकिनांचीही सोय होणार आहे. मागील वर्षी बरेच सामने रात्री उशिरापर्यंत चालले होते. त्यामुळे लांबून घरी परतणाऱयांची खूपच गैरसोय होत होती, असेही या सूत्राने सांगितले. सुटीच्या दिवशी सामन्यांना लोकांचा प्रतिसाद मिळणार असला तरी इतर कामाच्या दिवशी लोक त्यावेळेत सामना पाहण्यास येणार नाहीत, असे प्रँचायजींना वाटत आहे. मेट्रो सिटीमध्ये ट्रफिकची समस्या असते. त्यामुळे ऑफिसमधून सहा वाजता निघालेले घरी जाऊन परत सामना पाहण्यास ते येऊ शकतील का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मात्र दुपारच्या सामन्यासही लोकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याने ब्रॉडकास्टर व प्रँचायजी दोघांनाही स्टेडियम भरत नसल्याची चिंता वाटते. त्यावर उपाय म्हणून दुपारचा सामना रद्द करून फक्त एकच सामना खेळविण्याचा तोडगा काढण्यात आला आहे.