पुणे / वार्ताहर :
टपाल खात्यातील योजनांमध्ये ठेवीदारांकडून जमा करण्यात आलेल्या रक्कमेवरील 24 लाख रुपये कमिशनचा अपहार टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विमानतळ आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहार प्रकरणात सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत टपाल खात्यातील अधिकारी योगेश नानासाहेब वीर (वय 42, रा. खडकमाळ आळी, घोरपडे पेठ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिघी कॅम्प टपाल कार्यालयातील पोस्ट मास्तर ज्योतीराम फुलचंद माळी (वय 40, रा. येवलेवाडी, कोंढवा), लिपिक भगवान श्रीरंग नाईक (वय 36, रा. गणेश हाऊसिंग सोसायटी, दिघी, आळंदी रस्ता), विश्रांतवाडी भागातील धानोरी टपाल कार्यालयातील पोस्ट मास्तर गणेश तानाजी लांडे (वय 30, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी), पोस्ट मास्तर मधुकर गंगाधर सूर्यवंशी (वय 49, रा. भैरवनगर, धानोरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी माळी, नाईक, लांडे, सूर्यवंशी यांनी आळंदी रस्त्यावरील दिघी कॅम्प टपाल कार्यालयात एकुण 274 ठेवीदारांनी गुंतवलेली नऊ कोटी 62 लाख 98 हजार रुपयांची रक्कम स्विकारली. त्या रक्कमेपोटी 18 लाख 35 हजार 115 रुपयांची रक्कम धानोरीतील टपाल कार्यालयात जमा केली. या रक्कमेचा अपहार त्यांनी केला. ठेवीदारांच्या बनावट सह्या करुन त्यांनी टपाल खात्याची फसवणूक केल्याचे टपाल खात्यातील अधिकारी योगेश वीर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
विमानतळ पोलीस ठाण्यात ज्योतीराम फुलचंद माळी यांच्यासह रमेश गुलाब भोसले (रा. साळुंके विहार रस्ता, वानवडी), विलास एच. देठे (वय 59, रा. तात्या टोपे सोसायटी, वानवडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विलास देठे, फुलचंद माळी, रमेश भोसले उपडाकपाल म्हणून कार्यरत होते. माळी आणि भोसले यांनी 59 ठेवीदारांकडून दोन कोटी 47 लाख 60 हजार रुपये स्विकारली. या रक्कमेवर मिळालेले चार लाख 95 हजार 200 रुपयांचे कमिशन मिळाले. आरोपींनी मिळालेल्या कमिशनचा अपहार केला.
उपडाकपाल विलास देठे यांनी ठेवीदार तसेच सुकन्या समृद्धी योजनेतील रक्कम स्विकारली. ठेवीची रक्कम स्विकारण्यात आल्याची बनावट नोंद खातेपुस्तिकेवर केली. टपाल खात्याच्या फिनकॅप संगणकीय प्रणालीत नोंद केली नाही. ठेवीदारांनी जमा केलेल्या 45 हजार 900 रुपये रक्कमेचा अपहार केल्याचे टपाल खात्यातील अधिकारी योगेश वीर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.