शरीर तंदुरुस्त रहावे, यासाठी आपण प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रयत्न करत असतो. कोणी आहार नियंत्रण करून तर कोणी व्यायामावर भर देऊन तर कोणी नेहमीच्या आहारात परिवर्तन करून हे उद्दिष्ट साध्य करण्याचा चंग बांधतात. वजन वाढू नये, मधुमेह किंवा रक्तदाबासारखे विकार होऊ नयेत, त्याचबरोबर शरीर चपळ आणि चालतेहलते रहावे, यासाठी प्रयत्न केले जातात.
अनेक जण यासाठी एकवेळचे जेवणही टाळतात. पण एखादी व्यक्ती तंदुरुस्त शरीरासाठी 24 वर्षे केवळ नारळाच्या पाण्यावर राहिली आहे, हे आपल्याला खरे वाटणार नाही. अभिनेता आणि ट्रव्हल इन्फ्लुएन्सर शेनाज ट्रेझरी नामक व्यक्तीने हे वृत्त आपल्या इन्स्टाग्राम पेजवर प्रसारित केले आहे. हा प्रयोग करणाऱया व्यक्तीचे नाव आहे बालकृष्णन. बालकृष्णन 70 हून अधिक वयाचे आहेत. गेली 24 वर्षे ते केवळ नारळाचे पाणी पिऊन तंदुरुस्त प्रकृतीसह जीवन व्यतित करीत आहेत. 24 वर्षांपूर्वी त्यांना एका आजाराने ग्रासले होते. अनेक औषधे घेऊनही तो बरा होत नव्हता. मात्र, त्यांना कोणी तरी कोकोनट डाएटचा उपाय सांगितला आणि त्यांनी तो निष्ठेने केला. आज आपल्याला ठणठणीत प्रकृतीचा लाभ झाला असून कोणतीही अडचण नाही, असे ते म्हणतात. केवळ नारळाच्या पाण्यातून त्यांना प्रोटिन व इतर पोषक द्रव्ये कशी मिळतात? याचे इतरांना आश्चर्य वाटते.
तथापि, नारळाच्या पाण्यातही काही प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्वे असतात. तेवढी शरीरासाठी पुरेशी आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. नारळाच्या पाण्यामुळे आपली गॅसेसची समस्या पूर्णतः दूर झाली. वजनही बरेच कमी झाले आणि आपला जडपणा दूर झाला, असा अनुभव त्यांनी कथन केला आहे. अर्थात हा प्रयोग सरसकट सर्वांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नये, असा सावधगिरीचा इशाराही ते देतात. नारळाचे पाणी किंवा कोणताही नैसर्गिक द्रवरूप आहार शरीराला चांगलाच असतो. मात्र, हे फळांचे रस किंवा नारळाचे पाणी ताजे असावयास हवे. प्रक्रियाकृत अन्न कमीत कमी खाल्ल्यास शरीर तंदुरुस्त रहाते, असे त्यांचे म्हणणे आहे.