ऑनलाईन टीम / पुणे :
राज्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात उष्माघातामुळे 25 जणांचा बळी गेला आहे. (25 victims of heatstroke in the last two months maharashtra) तर 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली असून, मागील 8 वर्षातील उष्माघाताच्या बळींचा हा उच्चांक ठरला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
राज्यातील विविध भागातील तापमानात विक्रमी वाढ झालेली आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात 40 ते 46 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. उष्माघाताचे सर्वाधिक बळी हे विदर्भात झाले आहेत. विदर्भात नागपुरमध्ये 11, अकोला जिल्ह्यात 3 आणि अमरावतीमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर मराठवाडय़ातील जालना जिल्ह्यात दोन, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उष्माघाताबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहून सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. उष्माघाताबाबत राज्यांनी केंद्राच्या गाईडलाईन्सचं पालन करावे, नॅशनल ऍक्शन प्लॅनवर लक्ष केंद्रीत करावं, असे या पत्रात म्हटले आहे.
तसेच राज्यांच्या आरोग्यमंत्रालयांनी नियमावली तयार करावी, आरोग्य सुविधा वाढवाव्या, उष्माघाताशी संबंधित औषधांचा पुरेसा साठा तयार ठेवावा. सलाईन, आईसपॅक, ओआरएस, पेयजल यांचा पुरेसा पुरवठा करावा, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.