वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
पर्यटन व्हिसावर भारतात दाखल होत तबलिगी जमातच्या धार्मिक सोहळय़ात सामील होणाऱया 2550 विदेशी नागरिकांवर भारताने मोठी कारवाई केली आहे. या विदेशी नागरिकांवर पुढील 10 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. हे विदेशी नागरिक आता पुढील 10 वर्षांपर्यंत भारतात दाखल होऊ शकणार नाहीत. या विदेशी नागरिकांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
तबलिगी जमातच्या 2550 पेक्षा अधिक विदेशी सदस्यांनी भारताचा दौरा करत पूर्ण देशात तबलिगीच्या कार्यक्रमांमध्ये पर्यटक व्हिसावर भाग घेतला आहे. या सर्वांना 10 वर्षांसाठी काळय़ा यादीत टाकण्यात आले आहे. बंदी घालण्यात आलेल्या विदेशी नागरिकांची संख्या आणखीन वाढू शकते, असा अनुमान व्यक्त केला जात
आहे.
विविध देशांचे नागरिक
काळय़ा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या 2550 विदेशींमध्ये माली, नायजेरिया, श्रीलंका, केनिया, जिबूती, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, म्यानमार, थायलंड, बांगलादेश, ब्रिटन (ओसीआय कार्डधारक), ऑस्ट्रेलिया आणि नेपाळचे नागरिक सामील आहेत.
विविध राज्यांमध्ये धरपकड
निजामुद्दीनचे प्रकरण उघड होताच तबलिगी जमातच्या देशाच्या उर्वरित मरकजमध्येही विदेशी नागरिक सामील झाल्याचे समोर आले. तेलंगणापासून उत्तरप्रदेश-बिहार आणि झारखंडपर्यंत सर्व राज्यांमधील अनेक मशिदींमधून 700 पेक्षा अधिक विदेशींना पकडण्यात आले. यातील बहुतांश जण पर्यटन व्हिसावर भारतात आले होते.