राजस्थानातील बिलवाडी या गावात 26 वर्षांनंतर एका इतिहासाची अनोखी पुनरावृत्ती होत आहे. 1995 मध्ये या गावात ‘करण-अर्जुन’ नामक हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. तो चित्रपट चांगलाच गाजला होता. अमरीश पुरी हा त्या चित्रपटातील खलनायक होता. त्याचा धाक किती होता? हे दाखविण्यासाठी त्यावेळी या गावात संचारबंदी पुकारण्यात आली होती. सर्व लोकांना चित्रपटाचे चित्रीकरण होईपर्यंत घरात बंद करून ठेवण्यात आले होते. अर्थात त्यावेळी लोकांनी ही संचारबंदी स्वेच्छेने स्वीकारलीही होती.
आज 26 वर्षांनंतर कोरोनामुळे या गावात अशीच स्थिती बनली आहे. त्यावेळी अमरीश पुरीच्या ‘भीती’ने सारा गाव घरांमध्ये बंद असल्याचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. आज कोरोनामुळे खरोखरच साऱया गावाला घरात बसून रहावे लागत आहे. 1995 पूर्वी किंवा त्यानंतर आतापर्यंत या गावाच्या इतिहासात कधीही अशी वेळ लोकांनी अनुभवली नव्हती. 26 वर्षांपूर्वीची भीती नाटकीय होती. तर आताची खरीखुरी आहे. एवढा फरक वगळला तर वातावरण त्यावेळचेच आहे, असे या गावातील बुजुर्ग बोलताना आढळतात.