संशयित दहशतवाद्यांने वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कशाला मेसेज करून दिली धमकी
मुंबई ः
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी संशयित दहशतवाद्याने दिल्याने मुंबई पोलीस दल सतर्क झाले आहे. वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील मोबाईल फोनवर मेसेज करून ही धमकी दिली असून, यासंदर्भात आमचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.
संशयित दहशतवाद्याने शुक्रवारी पावणे बाराच्या दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील मोबाईल फोनवर अनेक मेसेज केले. या मेसेजमध्ये 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी दिली. तसेच फासावर लटकविलेला दहशतवादी अजमल कसाब, अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारला गेलेला अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अल-जवाहिरी याचा देखील उल्लेख केला असल्याची माहिती फणसाळकर यांनी दिली. या दहशतवाद्याने मेसेजमध्ये सहा जणांचे नंबर पाठविले असून, हे सर्व नंबरचे कोड पाकिस्तानातील असल्याचे तसेच काही नंबर पाकिस्तान आणि भारतातील असल्याचे समोर आले आहे. या मेसेजमध्ये भारतातील काहीजण आम्हाला साथ देत असल्याचा देखील उल्लेख केला आहे. मात्र हे मेसेज कोठून आणि कोणी पाठविले आहेत. यासंदर्भात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत, याचा तपास करण्यास क्राईम ब्रँचने सुरुवात केल्याची माहिती फणसाळकर यांनी दिली. त्याचप्रमाणे राज्य एटीएसला देखील याबाबत कळविले असून, केंद्रीय तपास यंत्रणांना देखील याची माहिती दिल्याचे फणसाळकर यांनी सांगितले.
मुंबईसह राज्यात सण-उत्सवाचे वातावरण असून, याला गालबोट लागणार नाही, याबाबत आम्ही गंभीर असून, मुंबईकरांच्या सर्व सुरक्षिततेची आम्ही काळजी घेण्यास तत्पर असल्याचे फणसाळकर यांनी सांगितले. तसेच सागरी सुरक्षेबाबत आम्ही अधिक लक्ष घातले असून, सागर कवच मोहीम देखील सुरू आहे. त्याचप्रमाणे, सागरी गस्त वाढविण्यावर आमचा भर असल्याचे फणसाळकर यांनी सांगितले. जवळपास 14 वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मधल्या काळात अनेकदा मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश पोलीस किंवा तपास यंत्रणांकडे आले आहेत. चौकशीअंती यातले बहुतेक संदेश कुणा माथेफिरूकडून आल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तरीदेखील अशा प्रत्येक संदेशाची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी केली जाते. त्यातच दोनच दिवसांपूर्वी रायगडमधील श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱयावर बोट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर या संदेशाची गंभीर दखल तपास यंत्रणांनी घेतली आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी रायगड जिह्यातील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱयावर एक 16 मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱयांना यासंदर्भात कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्यावेळी या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल्स आणि दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तत्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते. गृहमंत्र्यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये या बोटीसंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली असून ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या मालकीची असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
मात्र या संशयीत बोटीचा आणि मेसेजवर आलेल्या धमकीचा काही संबंध आहे का ? याचा देखील तपास सुरू असल्याचे फणसाळकर यांनी सांगितले.