सरकारविरोधात राजभवनवर घेऊन जात होते मोर्चा
प्रतिनिधी / पणजी
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची गेल्या तीन दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालयाकडून उलटतपासणी केली जात आहे. त्याचा निषेध म्हणून प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल गुरुवारी दोनापावला येथे मोर्चा काढून राजभवनावर जाण्याचा प्रयत्न केला. परवानगी घेतली नसल्याच्या कारणाखाली पोलिसांनी रस्ता अडविल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरसह 26 काँग्रेस कार्यकर्त्यांना 151 कलमाखाली अटक केली आणि नंतर संध्याकाळी जामिनावर सोडण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे झेंडे तसचे काळे झेंडे घेऊन सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनकर्त्यांनी राजभवनावर जाण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात महिलाही अग्रेसर होत्या. एक तर राजभवनावर जायला द्या नाहीतर अटक करा अशी मागणी महिला करीत होत्या. सरकार विरेधात जोरदार नारेबाजी केली. आम्हाला अडविण्याऐवजी राज्यात जी गुन्हेगारी वाढत आहे तिला आळा घाला, असा सल्लाही आंदोलनकर्त्या महिलांनी पोलिसांना दिला. काही प्रमाणात धक्काबुक्कीही होत होती. अखेर प्रकरण हाताबाहेर जाऊ लागल्याने पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली.
आंदोलनात 26 कार्यकर्त्यांचा समावेश
आंदोलनकर्त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, वरद म्हार्दोळकर, मनोहर नाईक, ऍर्वसन वाझ, नौशाद चौधरी, मुक्ता फोंडेकर, पॅ. व्हॅरिएटो फर्नांडिस, मॉरीनो रिबेलो, डॉम्निक फर्नांडिस, रोशन देसाई, पिलाजीया रापोस, डॅन्जील फर्नांडिस, शोम भंडारी, गौरेश शेलवणकर, विरेंद्र शिरोडकर, ऍन्तोनीयो सोझा, गजा देसाई, कृष्णा नेने, पिटर फर्नांडिस, इर्फान किल्लेदार, साईश आरोसकर, मनिशा उजगावकर, रेखा परब, आंद्रीया डिसमेलो, झरीन शेख, हर्षा साळगावकर यांचा समावेश होता.
पोलिसानीच आंदोलन चिघळवले : लोबो
काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लघन केले नव्हते. सरकारची कारवाई म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपले म्हणणे निवेदनाद्वारे राज्यपालांपर्यंत पोचवायचे होते. पाच ते सहा कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला राजभवनात जाण्याची परवानगी दिली असती तर कोणताही प्रकार घडला नसता. काँग्रेस कार्यकर्ते शांततापूर्वक निवेदन देऊन परत आले असते. सरकारच्या तालावर नाचणाऱया पोलिसानीच आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केला.
सरकारविरोधात न्यायालयात याचिका : खलप
अटक केलेल्या 26 काँग्रेस कार्यकर्त्यांना सशर्थ जामिनावर सोडण्यात आले आहे. प्रत्येकाकडून 5 हजार रुपयांचे हमीपत्र घेण्यात आले आहे. कँग्रेसने सरकारच्या कारभाराविरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला असून सोमवारी त्याच्यावर सुनावणी होणार असल्याचे ऍड. श्रीनिवास खलप यांनी सांगितले.
कायदा हातात घेतल्यामुळे अटक : शोबित सक्सेना
आंदोलनकर्त्यांनी नियमांचे उल्लंघन करून रस्ता रोखला होता. वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याचा कुणालाही हक्क नाही. आंदोलन करावे मात्र नियमांचे पालन करूनच, असे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी सांगितले. राजभवनावर जायचे असल्यास त्यांनी तशी रितसर परवानगी घ्यायला हवी होती. कायद्याने सर्व गोष्टी सुरळीत झाल्या असत्या, मात्र कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे आंदोलनकर्त्यांना अटक करावी लागली, असेही शोबित सक्सेना म्हणाले.