ट्रक्टर-ट्रॉली तलावात कोसळून दुर्घटना ः गावात शोककळा
कानपूर / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्हय़ात घाटमपूर येथे शनिवारी रात्री उशिराने झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 26 झाला आहे. भाविकांनी भरलेली ट्रक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन तलावात उलटल्याने हा अपघात घडला होता. या अपघातात 26 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती रविवारी सकाळी प्रशासनाकडून जारी करण्यात आली. मृतांमध्ये 11 मुलांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. तसेच 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान एका गावातील बहुतांश भाविक फतेहपूर येथील चंद्रिका देवी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. ट्रक्टर-ट्रॉलीमध्ये सुमारे 40 लोक होते. परतत असताना साध ते गंभीरपूर गावादरम्यान रस्त्यालगतच्या तलावात ट्रॉली पलटी झाली. यात बहुतांश भाविकांना प्राण गमवावे लागले. अपघातस्थळपासून गावाचे अंतर अवघे 5 किलोमीटर असताना ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. या वेदनादायक अपघातात तीन कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून घरात आता केवळ पुरुष उरले आहेत.
निष्काळजीपणाबद्दल ‘एसएचओ’ निलंबित
या अपघातानंतर ट्रक्टरचालक फरार झाला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. ट्रक्टर चालक अद्याप फरार असून या घटनेनंतर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल स्टेशन हाऊस ऑफिसरला (एसएचओ) निलंबित करण्यात आले. अपघाताचे ठिकाण पोलीस स्टेशनपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भदेउना गावाजवळ होते, परंतु एसएचओ सुमारे एक तासानंतर तेथे पोहोचले, असे एका वरि÷ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.
वारसांना जमीन आणि घर
या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधानांनी वारसांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आर्थिक मदतीबरोबरच गरीब कुटुंबांना सरकारी जमीन भाडेपट्टय़ावर देण्याची घोषणा केली आहे. तसेच ज्यांच्याकडे घरे नाहीत त्यांना पक्की घरे देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्णालयात जखमींची आणि गावात शोकग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रस्ते अपघातात होणारी जीवितहानी ही गंभीर चिंतेची बाब असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी सरकार रस्ता सुरक्षेबाबत अधिक जनजागृती कार्यक्रम राबवेल, असे सांगितले. तसेच लोकांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी ट्रक्टर-ट्रॉलीचा वापर न करण्याचे आवाहन केले.