दूरसंचार मंत्रालयाच्या निवेदनातून माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारने येत्या 500 दिवसात 25,000 मोबाइल टॉवर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याकरीता 26,000 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. दूरसंचार मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या लवकरच होणाऱया नियोजीत प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य ‘सॉवरेन सर्व्हिस लायबिलिटी फंड’ कडून घेतले जाणार असून ते भारत ब्रॉडबँड नेटवर्कद्वारे लागू केले जाईल.
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या डिजिटल इंडिया परिषदेत’ या प्रकल्पाची घोषणा केली. अधिकृत निवेदनानुसार, ‘दूरसंचार मंत्री आपल्या भाषणात म्हणाले, की डिजिटल इंडियासाठी कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे आणि ती देशाच्या कानाकोपऱयात पोहोचली पाहिजे. ते पुढे म्हणाले, की येत्या 500 दिवसात 25,000 नवीन मोबाइल टॉवर स्थापित केले जातील. याकरीता 26,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.’
या परिषदेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर, दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान आणि 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे माहिती तंत्रज्ञान मंत्रीही सहभागी झाले होते.