मंत्री उदय सामंत यांची माहिती, सर्वाधिक फटका दापोली, मंडणगडला, जिल्हय़ातील 11 जनावरांचा मृत्यू
प्रतिनिधी/ रत्नागिरी
चक्रीवादळामुळे जिल्हय़ातील किनारपट्टी गावांना जोरदार फटका बसला असून यामध्ये सर्वाधिक नुकसान दापोली आणि मंडणगड तालुक्यात झाले आहे. संपूर्ण जिल्हय़ात 27 हजार 782 घरांची परझड झाली आहे. या वादळात 3200 झाड कोसळली असून हजारो वीजखांबही जमीनदोस्त झाले आहेत. वादळात मनुष्यहानी झाली नसली तरी 11 जनावरांना जीव गमवावा लागला आहे. दापोली आणि मंडणगडमध्ये संपर्क यंत्रणाच कोलमडली आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱयांसह क्षतीग्रस्त भागांचा दौरा करणार असून अधिकाधिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हय़ातील 57.81 हेक्टर जमिनीवरील पिकांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. यात आंबा, काजू, नारळ, पोफळी बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हय़ातील 41 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यात 7 इमारती, दापोलीतील एक महाविद्यालय, 1 शासकीय गोदाम, खेडमध्ये 5 गोठय़ांचे, गुहागरमध्ये 1 टॉवर, 2 शासकीय इमारती, 1 समाजमंदीर, चिपळूणमध्ये 1 शासकीय गोदाम, 1 गॅरेज, रत्नागिरीत तलाठी कार्यालय व मंगलकार्यालयाचे नुकसान झाले आहे.
शनिवार आणि रविवारी या दोन्ही दिवशी आपण दापोली, मंडणगड दौऱयावर असून याठिकाणी जनजीवन पूर्ववत आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा नेण्यात येणार आहे. बहुतांश लोकांचे खाण्यापिण्याचे हाल होत असून दोन्ही तालुके अंधारात असल्याची माहिती सामंत यांनी दिली. शनिवारी 5 वाजता आढावा बैठकही घेण्यात येणार आहे. लोकांचे अन्नधान्य, कपडेलत्त्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याठिकाणी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हय़ातील ज्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत त्यांना 48 तासांत भरपाई देण्याच्या सूचना केल्याची माहिती सामंत यांनी दिली. बुधवारी दुपारी 2 वाजता वादळ थांबल्यानंतर काही तासातच यंत्रणा पंचनामे करण्याच्या कामाला लागली. त्यामुळे पंचनामे लवकरात लवकर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हय़ात महावितरणचे ताब्बल 20 कोटींचे नुकसान झाले आहे. सुमारे दीड लाख लोकांच्या घरात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. 930 विद्युत पोल जिल्हय़ात कोसळले असल्याने बहुतांश गावे अंधाराखालीच असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली.
वादळामुळे 8 जण जखमी
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त आकडेवारीप्रमाणे वादळात एकूण 8 जण जखमी झाले. यापैकी 6 जण रत्नागिरी तालुक्यात, तर दोनजण दापोली तालुक्यातील आहेत. मंडणगड तालुक्यात 3 म्हशी, 4 गायी, 2 बैल तर दापोली तालुक्यात 1 बैल व 1 गाय अशा 11 जनावरांचे प्राण या दुर्घटनेत गेले.
दापोलीत 18 हजार घरांना झळ
मंडणगड तालुक्यात कोंझर, पाट, म्हाप्रळ, चिंचाळी, पन्हाळी, इस्लामपूर, पुंभार्ली, सोवेली, पंदेरी, कोंडगाव, बहिरवली, दंडनगरी, उंबरशेत, मूर्डी, करंजे अशा 15 गावातील 8 हजार घरांची पडझड झाली. दापोली तालुक्यातील पाज, हर्णै, उटंबर, केळशी, आडे, पाडले, आंजर्ले, मुरुड, कर्दे, पंचनदी, दाभोळ, जुवेकर मोहोल्ला, लाडघर, करजगाव, फोडखरे अशा 15 गावातील 18 हजार घरे क्षतीग्रस्त झाली. खेड तालुक्यातील 567 घरांची पडझड झाली. गुहागर तालुक्यातील 196 घरांची पडझड झाली. चिपळुणातील 322 घरांना वादळाचा तडाखा बसला. संगमेश्वर तालुक्यातील 48 घरांना आपत्तीचा धक्का बसला. जयगड, मालगुंड, रत्नागिरी तालुक्यातील अनेक गावांना वादळाचा धक्का बसला. या तालुक्यात 629 घरांची पडझड झाली. लांजातील 6 तर राजापूरातील 14 घरांना तडाखा बसला. जिह्यातील 27 हजार 782 घरांची पडझड झाली.
3200 झाडे, 950 वीज खांब आडवे
मंडणगड तालुक्यात 700 झाडे जमिनदोस्त झाली. तेवढीच झाडे दापोली तालुक्यात पडली. खेड तालुक्यात 200, गुहागर तालुक्यात 500, चिपळूण तालुक्यात 400, संगमेश्वरात 100, रत्नागिरीत 500, लांजात 50, राजापूरात 50 अशी 3200 झाडे वादळात जमिनदोस्त झाली. विजेचे खांब किंवा तारा पडण्याचे प्रकार मंडणगडात 300, दापोलीत 300, खेडमध्ये 29, गुहागरात 170, चिपळुणात 1, रत्नागिरीत 100, लांजात 20, राजापुरात 10 असे 930 ठिकाणी घडले.