ऑनलाईन टीम / मुंबई :
3 मे नंतर झोन नुसार थोडी मोकळीक दिली जाणार पण कोणतीही घाईगडबड न करता ही मोकळीक दिली जाणार आहे. मात्र, रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे सारख्या शहरात धोका कायम असल्याने या भागात लॉक डाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे, असे संकेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.
उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला.
ते म्हणाले, 3 मे नंतर काय हा मुद्दा आहे. आम्ही अजून किती दिवस घरी बसायचे हा प्रश्न विचारला जात आहे. लॉक डाऊनमुळे अर्थचक्र रुतलं आहे. बेरोजगारीचे संकट समोर आहे असं बोललं जात आहे. हे जरी खरं असलं तरी राष्ट्राची खरी संपत्ती जनता आहे. तिला प्राथमिकता देणे गरजेचे आहे. नागरिक वाचले पाहिजेत. ते वाचले तर हा गाडा चिखलातून पुढे नेऊ शकतो, असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले, रेड झोन मध्ये आता काही करणे हिताचे नाही आहे. पण ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील अटी हळूहळू शिथिल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे सांगत ते म्हणाले, रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी आहे. ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी तर ग्रीन झोन म्हणजे ज्वालामुखी जो पेटेल असा वाटत नाही.
तसंच परराज्यात जाण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना तिकडे जाण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी आम्ही देखील सोयी – सुविधा करत आहोत पण लगेच सर्वांनी गर्दी करू नका अन्यथा परवानगी नाकारली जाईल, त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसचं शेती वरील बंधने उठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खते, बि- बियाणे पुरवली जातील. मालवाहतूक काही मोकळी केली आहे हळूहळू त्यावरील देखील बंधने उठवले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.