जि.प.प्रशासक संजयसिंह चव्हाण यांची माहिती : सुमारे 2 लाख सदोष झेंडे पाठवले परत : जि.प.मध्ये आजपासून साजरा होणार स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव
प्रतिनिधी/कोल्हापूर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेसाठी जिल्हा परिषदेकडे शासनाकडून वितरीत करण्यात आलेल्या 5 लाख झेंडय़ांपैकी सुमारे 2 लाख झेंडे राष्ट्रध्वज संहितेनुसार तयार झाले नसल्यामुळे ते परत पाठवले आहेत. तर सुमारे 3 लाख झेंडे वितरीत केले आहेत. 13 ते 15 एप्रिलपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होणार असून त्या पार्श्वभूमीवर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
प्रशासक चव्हाण म्हणाले, 13 ऑगस्ट रोजी सकाळी कागलकर हाऊस इमारतीसमोर स्वातंत्र्य सैनिक वसंतराव माने (वय 90) यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हुतात्मा मेजर सत्यजित शिंदे यांचे वडील अजितसिंह शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. 14 ऑगस्टला कागलकर हाऊस येथे हुतात्मा जवान संग्राम पाटील यांच्या पत्नी हेमलता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर जि.प. गोपाळकृष्ण गोखले यांचे थेट पणतू कॅप्टन विकास गोखले यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. 15 ऑगस्ट रोजी कागलकर हाऊस येथे जिल्हा परिषदेत दररोज ध्वजाचा प्रोटोकॉल सांभाळणारे कर्मचारी तथा माजी सैनिक सुभाष कुंभार यांच्या हस्ते तर जि.प.च्या प्रांगणात प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या तीन दिवसांत कार्यक्रमासाठी दररोज एक शाळेतील मुलांना बोलावले जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेवर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.
स्वातंत्र्य सैनिक, विधवा, माजी सैनिकांचे हस्ते ध्वजारोहणाचे आवाहन
जिह्यातील पंचायत समित्या, ग्रामपंचायतींस अन्य संस्थांमध्ये स्वातंत्र्य सैनिक अथवा त्यांचे वारसदार, विधवा किंवा माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.