जम्मू काश्मीरमध्ये मोहीम तीव्र : 24 तासात 6 जणांना संपवले
कुपवाडा / वृत्तसंस्था
सुरक्षा दलांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. पहाटेच्या एका कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुपवाडय़ातील जुमागुंड गावात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. कारवाईवेळी दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये संघर्षमय चकमक झाली. यादरम्यान मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले.
मृत दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. यापूर्वी बुधवारी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले होते. या वर्षात सुरक्षा दलांनी एकूण 26 पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले आहे.
5 दहशतवाद्यांना अटक
जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोमवारी लष्कर-ए-तोयबाच्या 5 दहशतवाद्यांना अटक केली होती. यापैकी तिघांचा गेल्या महिन्यात बारामुल्ला येथे झालेल्या सरपंचाच्या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. तर, काश्मिरी पंडित कर्मचारी राहुल भट यांच्या हत्येमध्ये कथितपणे सहभागी असलेले लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी 13 मे रोजी बांदीपोरा जिल्हय़ात चकमकीत मारले गेले.
जानेवारीपासून 26 पाकिस्तानी दहशतवादी ठार
सुरक्षा दलांनी वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद संघटनांशी संबंधित 26 परदेशी दहशतवाद्यांना ठार केले आहे, असे काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. यातील 14 दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी आणि 12 दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. काश्मीर खोऱयात स्थानिक दहशतवाद्यांची संख्या कमी होत असल्याने परदेशी दहशतवाद्यांना कारवाया करण्यासाठी दबा धरून बसलेल्या ठिकाणाहून बाहेर पडणे भाग पडत असल्याचा दावा स्थानिकांच्या हवाल्याने सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे.