उत्तरप्रदेशातील रामपूर या पूर्वीच्या संस्थानाचा नबाब आणि त्याच्या घराण्याची 300 कोटी रुपयांची संपत्ती भारत सरकारला हवी आहे. यासाठी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. आता पुढील सुनावणी सोमवारी आहे.
रामपूरच्या नबाब घराण्याची शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यापैकी 300 कोटी रुपयांची मालमत्ता ‘शत्रू संपत्ती’ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे केंद्र सरकारने या मालमत्तेवर आपला अधिकार सांगितला आहे. भारताच्या गृहविभागाच्या अधिकाऱयांनी या शत्रू संपत्तीसंबंधी पत्रक प्रसिद्ध केले आहे. आता शत्रू संपत्ती म्हणजे काय हा प्रश्न निर्माण होतो. 1965 मध्ये भारत सरकारने एक कायदा केला होता. त्यानुसार कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाची भारतातील संपत्ती शत्रू संपत्ती म्हणून ओळखली जाते आणि त्यावर भारत सरकारचा अधिकार निर्माण होतो. रामपूर नबाब घराण्याची एकंदर मालमत्ता 2600 कोटी रुपयांची आहे. या संपत्तीच्या वाटणीचे दावे न्यायालयात प्रलंबित आहेत. 31 जुलै 2019 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम व्यक्तिगत कायद्यानुसार वाटणी करण्याचा आदेश दिला आहे. यातून या 300 कोटी रुपयांच्या संपत्तीचा पत्ता लागला आहे.