9 पाकिस्तानींना अटक ः भारतीय तटरक्षक दलाची कारवाई
कच्छ / वृत्तसंस्था
गुजरातच्या दहशतवादविरोधी दलाने 300 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ भारतात आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्या 9 पाकिस्तानींना अटक केली आहे. या कारवाईत या दलाला भारतीय तटरक्षक दलानेही साहाय्य केले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. हे सर्व अंमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत.
हे अंमली पदार्थ अल हाज या पाकिस्तानी बोटीतून गुजरातच्या सागरतटारवर उतरविण्यात येणार होते. मात्र, तटरक्षक दलाला संशय आल्याने ही बोट अडविण्यात आली. बोटीची झडती घेतली असता अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. ही बोट रविवारी रात्री उशिरा भारताच्या सागरी कक्षेत प्रवेशली होती. तेव्हापासून तिच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. भारतीय तटरक्षक दलाने पाठलाग सुरु केल्याने बोट पाकिस्तानात परत जाण्याचा प्रयत्न करीत होती. बोटीतील अंमली पदार्थ समुद्रात फेकण्यात आले होते. मात्र, नंतर हे सर्व पदार्थ पाण्यातून बाहेर काढून जप्त करण्यात आले. पाठलागातून सुटका करुन घेण्यासाठी या पाकिस्तानी बोटीवरुन गोळीबारही करण्यात आला. तथापि, बोटीला शिताफीने पकडण्यात आले आणि 9 पाकिस्तान्यांना अटक करण्यात आली.
एक आठवडय़ातील दुसरा प्रकार
गेल्या आठवडय़ात गुजरातच्याच सागर तटावर कांडला येथे 1,500 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपासून गुजरातचा समुद्रतट हा अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथे गस्त वाढविण्यात आली असून वारंवार अंमली पदार्थ ताब्यात घेतले जात आहेत. गस्त वाढविल्याने या तस्करीचे प्रमाण घटले आहे. गेल्या फेब्रुवारीत याच भागात 750 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तर गेल्या सप्टेंबरमध्ये 21 हजार कोटी रुपयांचे 3000 किलो हेरॉईन पकडण्यात आले होते.